Wednesday, August 26, 2020

तुमचं हक्काचं ठिकाण...

"अग तुझा चेहरा आज असा का दिसतोय?"

" काही नाही गं..."

" नाही कसं ? काय झालंय..बोल न .."

आणि मग मनात साचलेलं सगळं मळभ तिच्याजवळ रिकामं होतं..एखादी गच्च कोंबून भरलेली बॅग रिकामी करावी तसं आणि  मग जादूची कांडी फिरवल्यागत मन क्षणार्धात एकदम मोकळं होऊन जातं..

हेच.. हेच ते *हक्काचं ठिकाण.. My Happy Place !!* 

         फक्त आठवून बघा अशी कोणती  हक्काची ठिकाणं आपल्या जवळ आहेत ?? मनाला उभारी , खराखुरा विसावा देणारी .. एक एक आठवत चला.. एकदम फ्रेश वाटेल !! त्या व्यक्तीसोबतचे संवाद किंवा गमतीजमती एखाद्या सिनेमासारख्या तुमच्या डोळ्यांपुढून तरळून जातील..कुठल्या एखाद्या मैत्रिणीसोबत मन हलकं फुलकं होतं तर एखाद्या मित्रासोबत खळखळून हसल्या जातं , भावा सोबत बालपणीच्या आठवणी, चिडवाचिडवी..तर एखाद्या नातेवाईकांसोबत साहित्यिक चर्चा...sooo coool असं feeling देणारी ही ठिकाणं !!

              अशी मोजकीच पण हक्काची ठिकाणं प्रत्येकाच्या आयुष्यात नक्कीच असतात..आई वडील तर खास हक्काचेच.. त्याशिवाय मित्र ,मैत्रीण ,भाऊ ,बहीण,

भावजय,दीर,नणंद , cousins ,नातेवाईक .. कुणीही असू शकतं  तुमचं *हक्काचं ठिकाण , Your true Happy Place !!*

     जिथे आपुलकी, जिव्हाळा तर असतोच, पण सोबत असते संजीवनी.. मनाला जिवंत करणारी !! किंवा अगदी एखादा  *व्हॉट्सॲप ग्रुप* सुद्धा.. जिथे नुसतं डोकावलं, नुसता एक virtual  फेरफटका मारला तरी मन एकदम relax होतं !

           निसर्गरम्य ठिकाणी गेल्यावर एकदम फ्रेश वाटतं तसंच आपल्या या हक्काच्या ठिकाणी.. त्यांच्या सहवासात एकदम relax, fresh वाटतं.. मन  हलकं हलकं होऊन जातं.. अगदी मोरपिसासारखं !! तिथे कुठलाच आडपडदा नसतो  किंवा  show-off ही नसतो.. अगदी मनातलं हृदयातलं सहज बोलता येतं, व्यक्त होता येतं... कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे  तुमच्या अशा हक्काच्या ठिकाणी तुम्हाला समजून तर  घेतल्या जातंच पण महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ह्यांच्याकडून Judge केल्या जात नाही ! आणि म्हणूनच अशा व्यक्तींच्या सहवासात तुम्हाला अगदी निवांत.. मन मोकळं वाटतं..

*"तुमको देखा , तो ये खयाल आया*

*जिंदगी धूप , तुम घना साया !!"*

        ही हक्काची  ठिकाणंही अगदी अशीच..सावली देणारी ,विश्रांती देणारी.. थकल्याभागल्या  जीवाला आणि मनाला !!आणि गंमत म्हणजे अशी माणसं आरशासारखी असतात.. गुण आणि दोष दोन्ही दाखवणारी..म्हणून जास्तं विश्वास !! 

         अशी हक्काची ठिकाणं अगदी जीवापाड जपूssssन ठेवायला हवीत.. हिऱ्या माणकां पेक्षा जास्त !! ती हरवायला नकोत,आयुष्याच्या गडबडीत.. कारण यांची फक्त साथही लाख-मोलाची !! Loneliness किंवा एकटेपणा दूर करणारी..म्हणूनच *"तुझ्याशी बोलून खूssssप बरं वाटतं"* हे त्यांना नक्की सांगायालाच हवं .

       कुणाचीही आत्महत्या कानावर आली की वाटून जातं  की मन मोकळं करायला त्यांच्या जवळ असं एकही हक्काचं ठिकाण नसेल ? जिथे अगदी खरंखुरं व्यक्त होता येईल?कारण व्यक्त होणं ही प्रत्येकाचीच सर्वात मोठी गरज !! त्याशिवाय मोकळा श्वास कसा घेता येणार ? 

        आपण आपल्या आयुष्यातली सगळी हक्काची ठिकाणं तर जपावीच पण आपणही कुणाचं तरी हक्काचं ठिकाण नक्कीच असायला हवं... !! नाही का ?

*खूsssssप बरं वाटलं ना वाचून? मग friends आणि सर्व हक्काच्या ठिकाणांना  जरूर शेअर करा आणि सांगा 'खूsssप बरं वाटतं तुझ्यासोबत' !!*

Friday, July 24, 2020

कोरोनाची भीती नको...

कोरोना हा एक कॉमन कोल्ड आहे. कॉमन कोल्ड म्हणजे साधा सर्दीचा आजार! अनेक ग्रंथामध्ये त्याची ओळख कॉमन कोल्ड या नावाखालीच दिलेली आहे. हा आजार आतापर्यंत अनेकांना कितीतरी वेळा होऊन गेलेला असेल. आणि कित्येकांना लागण होऊनही काहीच लक्षणे न दिसल्याने आपोआप बराही झालेला असेल.
हे मी माझ्या मनाचे सांगित नाही. पद्मश्री डॉ. रमण खंडेलवाल यांची गेल्या चार दिवसापूर्वी माझावर मुलाखत घेतली होती. ते याच क्षेत्रात काम करतात. त्यांनी कोरोना विषयी खूप छान तथ्यात्मक माहिती सांगितली. त्यांच्या म्हणण्यानुसार कोरोनाच्या व्हायरसची जरी लागण झाली तरी 80 टक्के लोकांना काहीच लक्षणे दिसत नाहीत. तो आजार येतो आणि चार-सहा दिवसांमध्ये आपोआप निघूनही जातो. 15 टक्के लोकांना सामान्य उपचारांची गरज भासते. तेही साध्या उपचाराने बरे होऊ शकतात. पाच टक्के लोकांच्या बाबतीत मात्र कॉम्प्लेक्स निर्माण होऊ शकतो. पण हे पाच टक्के लोक म्हणजे जे वयोवृद्ध आहेत, ज्यांची प्रतिकारशक्ती अगदी मामुली आहे, ज्यांना डायबिटीस, हृदयविकार, टी.बी. किंवा तत्सम स्वरूपाचा पूर्वीचाच कुठला तरी आजार आहे. अशा लोकांपैकी काही लोक मरू शकतात. हे आहे कोरोनाचे सत्य. म्हणजे सुमारे 95 टक्के लोकांना कोरोनामुळे मृत्यू येण्याची शक्यता जवळ जवळ नगण्य आहे. साध्या उपचारानेही तो बरा होऊ शकतो.

*कोरोनाचा प्रसार*

कोरोनाचा प्रसार हवेतून होत नाही. त्यामुळे आपण एकटे असताना किंवा आपल्या आसपास काही फुटांवर कोणी माणूस नसताना तोंडाला मास्क बांधणे अवैज्ञानिक आहे. कोरोनाचा आकार आहे, शंभर नॅनोमिटर. आणि आपल्या फडक्याची छिद्रे किती मोठी असतात, आपणास माहीत आहेच. मित्रांनो! आपण नव्हतो, तेव्हाही लाखो व्हायरस होते आणि आपण नसल्यानंतरही व्हायरस राहाणार आहेत. या विश्वातील सर्व प्रकारचे पशू, पक्षी, प्राणी, किटक, जिवाणू, विषाणू हे सर्व निसर्गाचे अविभाज्य घटक आहेत. त्यांच्याबरोबरच आपणास आपले जीवन जगायचे आहे. या जगात सुमारे 2 लाख 30 हजार प्रकारचे व्हायरस आहेत. आपण त्यांना टाळू शकत नाही. तर आपण स्वतःला अधिक सामर्थ्यशाली, शक्तीशाली बनवावे लागते. त्याच्या काही पद्धती आहेत.

*डर का माहोल*

अनेक प्रकारच्या रोगांने मृत्यूचा आकडा पाहिला तर कोरोनापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. मात्र कोरोनाने झालेल्या मृत्यूचा स्फोट केला जातोय. जगात कुठेही कोणी कोरोनाने मेले तर लाखो-कोट्यवधी माध्यमांतून त्याची बातमी जगभर पसरवली जातेय. त्यातून एक फार मोठी भिती जनमानसामध्ये पसरली आहे. मरणाच्या बातम्या पुन्हा पुन्हा सांगितल्या जात आहेत. चांगले झालेल्या लोकांचे आकडे फोकस करून सांगितले जात नाहीत.

*भीतीचे परिणाम*

पूर्वी येऊन गेलेल्या साथीवर अनेक मानसशास्त्रज्ञांनी समाजातील लोकांचे सर्व्हे केले तेव्हा लक्षात असे आले की प्लेग, देवी वगैरे आजारांनी मेलेल्या लोकांपेक्षा नुसत्या भीतीने मेलेल्या लोकांची संख्या जास्त होती! कुठल्याही साथीला, आजाराला, परिस्थितीला सामोरे जायचे असते. भ्यायचे नसते. पूर्ण शक्तिनिशी त्याचा मुकाबला करायचा असतो. यातच माणसाचे मनुष्यपण आहे. पण आज जास्तीत जास्त भीतीचे वातावरण पसरवण्याचे काम जणू काय मुद्दाम केले जातेय असे वाटायला लागते. त्याच्या ब्रेकिंक न्यूजचा विषय बनवला गेलाय. सामान्य माणसाला इतर गोष्टींची माहिती नसल्याने भीतीने ते अगदी गांगरून जातात. ही भीती का पसरवली जातेय, त्याचे कारण आहे.

*डर का व्यापार*

जितकी भीत मोठी तितका मोठा व्यापार करता येतो. हे व्यापार कोण करतं, हे आजपर्यंतच्या इतिहासाने पुनःपुन्हा दाखवून दिलेले आहे. या जगातील सर्वांत मोठी बाजारपेठ जर कुठली असेल तर ती आहे, (हेल्थ इंडस्ट्री)आरोग्यसेवा व्यवसाय.

*सत्ता आणि सत्य*

विज्ञान हे सत्यावर आणि तथ्यावर चालत असते आणि सत्ता किंवा सरकार हे पर्शेप्शनवर चालत असते. तेव्हा विज्ञान काय सांगते, आजपर्यंत जे जे संशोधन झालेले आहे, ते काय सांगते त्याच्याकडे जरा डोळे उघडे ठेवून पाहायला हवे. वैज्ञानिक तथ्य जर समजून घेतले तर भीतीचे वातावरणही निवळेल आणि जगण्याचा सुंदर मार्गही सापडेल. स्वातंत्र्याच्या वातावरणात मुक्तपणे श्वास घेण्याचे सामर्थ्य निर्माण करणाऱ्या श्रद्धेला आपण जागे करूया. प्रेमाने प्रस्फुरीतच,प्रफुल्लित झालेले आणि ज्ञानाने दिग्दर्शित केलेले विवेकी जीवन आपण जगूया. हे भीतीचे वातावरण(डर का माहोल)योग्य नाही. तो वैज्ञानिक नाही. सत्यावर आधारित नाही. तो एक बाजारू फंडा आहे. सरकार काय सांगते आणि विज्ञान काय सांगते याचा विचार व्हायला हवा.

*माणसे का मरताहेत?*

कोरोना एक कॉमन कोल्ड आहे, तर इतकी माणसे का मरताहेत? असा स्वाभाविक प्रश्न विचारला जातोय.
1. त्याचे उत्तर असे की माणसे नेहमीच मरत असतात. ती जगभर मरतात. कोरोनाच्या नावावर जेवढी मरणे खपवली त्याच्यापेक्षा जास्त दुसऱ्या आजाराने मरताहेत. संपूर्ण जगातील आकडा इतर रोगांच्या मानाने फारच कमी आहे.
2. ज्या इटलीमध्ये जास्त माणसे मेली कारण इटलीत वृद्ध माणसांची संख्या जास्त आहे. म्हातारी माणसे काहीतरी निमित्त होऊन मरतातच.
3. सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे माणसे उपचाराच्या पद्धतीमुळे जास्त मरताहेत! कोरोना झालेल्या माणसांवर जे प्रोटोकॉलनुसार उपचार केले जाताहेत त्यामुळे माणसे जास्त मरताहेत. कारण त्याच्यावर नको त्या औषधांचा मारा केला जातोय. त्यामुळे जीवनशक्ती अगदी कमकुवत होऊन जाते आणि मग शरीर साथ द्यायची सोडून देते. म्हणजे इथे रोगापेक्षा उपाय भयंकर आहे.
गेल्या वर्षी इटलीमध्ये नुसत्या मलेरियाने दोन लाख लोक मेले होते. मात्र त्याच्या अशा बातम्या दाखवल्या नाहीत. त्याच्या ब्रेकिंग न्यूज आल्या नाहीत. म्हणून ते लोकांना माहीत नाही. ईश्वर ना करो, पण इटलीमध्ये अजून मरणाचा आकडा वाढू शकतो. कारण प्रत्येक वर्षी तिथे तेवढे लोक इन्फेक्शनने मरतातच. आय. एल. आय. म्हणजे इन्फ्लुएंझा लाईड इलनेस या आजाराने 20 हजारांहून लोक मेले होते.

*निसर्गाची व्यवस्था*

साथी येतात-जातात, दुष्काळ, महापूर, भूकंप इ. नैसर्गिक गोष्टी घडणे हा एक नैसर्गिक भाग आहे. महामारी हे एक निसर्गाची बॅलन्सिंग व्यवस्था आहे. जेव्हा कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होतो, अनेक गोष्टींमध्ये विषमता निर्माण होते, सृष्टीचक्रामध्ये काही वेगळ्या गोष्टी घडू लागतात, तेव्हा अशा घटना घडतात आणि त्याचे बॅलंसिंग साधले जाते. ही व्यवस्थासुद्धा नैसर्गिक नियमाचाच एक भाग आहे.
जन्म-मरण हे चक्र सातत्याने सुरूच आहे. निसर्ग काही आपल्या हातातील गोष्ट नाही. तो सातत्याने वेगवेगळ्या प्रकारची परिस्थिती आपल्यापुढे निर्माण करीत असतो. त्या परिस्थितीला आपण सामोरे कसे जातो किंवा तिचा मुकाबला कसा करतो, तिला प्रतिसाद कसा व काय देतो, याच्यावर आपले जीवन, जगणे आणि त्याचे परिणाम अवलंबून असतात.

*आपण व्हायरसला मारू शकत नाही*

व्हायरस हे जिवंत व्यक्तिमत्त्व नाही. त्यामुळे त्याला मारू शकत नाही. तो शरीरात गेल्यानंतरच जैविक लक्षणे दाखवतो. आपण व्हायरसपासून पळून जाऊ शकत नाही. घरात कोंढून घेतले तरी आपल्या घरात आपल्या आसपास हजारो-लाखो व्हायरस वावरत असतात! खरे तर व्हायरस हा आपला निसर्गातील एक सोबती आहे, सहचारी आहे. मग आपण काय करायचे? आपण जसे पडणाऱ्या पावसाला थोपवून धरू शकत नाही. तसे व्हायरसला थोपवू शकत नाही. मग पावसापासून संरक्षण करण्यासाठी आपण काय करतो? आपण छत्रीचा वापर करतो. नेहमीसाठी घर बांधून ठेवतो. जेव्हा लढायी सुरू असते तेव्हा आपल्यावर वार होऊ नये म्हणून आपण काय करतो? आपण ढालीचा वापर करतो आणि आलेला वार त्याच्यावर झेलतो. तसेच व्हायरसचा मार झेलण्यासाठी आपल्या शरीरात प्रतिकारशक्ती नावाची जी ढाल आहे, तिचा वापर करणे हाच याचा प्रथम आणि शेवटचा सर्वोत्तम उपाय आहे. हा उपाय कोण सांगू शकते? जनमानसापर्यंत कोण घेऊन जाऊ शकते? हे काम डब्ल्यू. एच. ओ. करणार नाही. हे काम इंडियन मेडिकल असोशिएशन करणार नाही. हे काम फक्त आयुष मंत्रालय करू शकते. आता फक्त एकच आशा भारतातील आयुष मंत्रालयावर आहे.

*Corona Is Conspiracy* (करोना एक कट कारस्थान,एक षडयंत्रच)

फरिदाबाद निवासी डॉ. विश्वरूपराय चौधरी यांनी जानेवारीमध्येच सांगितले होते, की कोरोना ही एक काँन्स्पीरसी,कुटील कारस्थान  आहे. आता तर निकारूग्वा, ब्राझील आणि मॅक्सिकोचे अध्यक्षही जाहीरपणे म्हणताहेत की, कोरोना हि काँन्स्पीरसी  आहे. ते एक षडयंत्र आहे!

*कोरोना एक हॉरर पिक्चर*

तुम्ही कधी भुताचा हॉरर सिनेमा पाहिलाय का? आपल्याला माहीत असते की पडद्यावरचे भूत येऊन आपल्याला काहीही करणार नाही. तरीही आपण घाबरलेले असतो. हृदयाचे ठोके वाढलेले असतात. तसे आपल्या घरातल्या टी.व्ही.वर हा कोरोनाचा हॉरर पिक्चर सुरू आहे. घरातल्या छोट्या पडद्यावर आता त्याचा क्लायमॅक्स होत आलाय. काही दिवसांतच त्याचा दी एन्ड होईल! कोरोना हा एक हॉरर पिक्चरसारखाच भाग निर्माण केलाय. लक्षात ठेवा, कोरोना हा एक कॉमन कोल्ड आहे. तो 80 टक्के लोकांना झालेला माहीतही होत नाही. साधा आजार आहे. भिऊ नका. दक्षता घ्या.

*जीवन आणि दक्षता*

फक्त कोरोनासाठीच नव्हे तर जीवनात नेहमीच दक्षता बाळगावी लागते. पदोपदी दक्ष राहावे लागते. थोडेसे लक्ष दुसरीकडे गेले तरी ठेच लागते किंवा खड्यात पाय जाऊ शकतो. दुर्लक्ष झाले तर अपघात होऊ शकतो. दक्षता ही जीवनभर नेहमीसाठी घेण्याची गोष्ट आहे. तशीच दक्षता घ्या. भीती नको. तुम्ही जर भीती बाळगली तर भीतीमुळे जीवनशक्ती म्हणजे प्रतिकारशक्ती कमी होते आणि नको तो आजार चिकटतो. त्यामुळे भीती सोडा आणि दक्ष व्हा!

औषधाने आजार बरा होत नाही

कुठलाही आजार हा औषधाने बरा होत नाही. कारण आपण औषधे खात नाही, म्हणून आजार होत नाही, तर आजाराची कारणे अन्यत्र असतात. शरीर स्वतःहूनच आजार बरा करीत असते. त्यासाठी शरीरातील प्रतिकारशक्ती रात्रंदिवस युद्धपातळीवर काम करीत असते. तिला बलवान बनवणे हे आपल्या हातात आहे. जर युद्ध जिंकायचे असेल तर सैनिकीशक्ती बलवान करावी लागते. तिला योग्य ती हत्यारे व रसद पुरवावी लागते. तसेच शरीराचे आहे. शरीरातील सैनिकी शक्ती बलवान बनवा.

*प्रतिकारशक्तीची त्रिसूत्री*

प्रतिकारशक्ती बलवान बनवण्यासाठी तीन सूत्री कार्यक्रमाचा अवलंब केला तर ती सबळ होऊ शकते.
1. प्राकृतिक आहार – यामध्ये शरीरातील पेशीला 40 प्रकारचे अन्नघटक लागतात. त्या सर्व घटकांची पूर्ती करणाऱ्या गोष्टींचा आहारात समावेश असावा. शरीरात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण करणारे जंक फुड, फास्ट फुड खाऊ नये. प्राकृतिक मौसमी फळे, भाज्या आणि धान्ये यांचा आहारात समावेश असावा. रोज पोट भरून फळे व भाज्या प्राकृतिक स्वरूपात म्हणजे कच्या स्वरूपात खावीत. नंतर तुम्हाला जे हवे ते खा. अन्न, पाणी आणि हवा याच्यावर आपले जीवन अवलंबून आहे.
2. योग्य तो व्यायाम – व्यायामामध्ये दम लागेपर्यंत चालणे, सूर्यनमस्कार, आसने, प्राणायाम (श्वासाचा व्यायाम) हा नित्य नियमाने व्हावा. प्राणायाम हा रोगनिवारणाचे कार्य करीत असतो. हवा ही एक दवा आहे.
3. पुरेसा विश्राम – शांत आणि गाढ झोप घ्यावी. अति आवाज, गोंधळ, यांने स्नायू तानलेल्या स्वरूपात राहातात त्यामुळे शरीराला विश्रांतीच मिळत नाही. शरीरातील पेशी-पेशींला विश्रांती मिळाली पाहिजे. ती रोज झोपेत मिळते. पण शांत झोपच लागत नाही. त्यासाठी योगनिद्रेचा अभ्यास करावा किंवा रोज न चुकता जेव्हा जिथे वेळ मिळेल तिथे ध्यान करावे. तुमचे जे आताचे वय आहे, तुम्हास जेवढी वर्षे झालीत तेवढे मिनिटे रोज ध्यान व्हायला हवे. ध्यान करण्यासाठी न हालता स्थिर बसणे आणि येणाऱ्या-जाणाऱ्या श्वासाकडे तटस्थपणे पाहात राहाणे एवढे जरी केले तरी पुष्कळ आहे.
मित्रांनो! आपण माणूस आहोत. माणसाने वेळोवेळी अनेक संकटाशी मुकाबला करीत स्वतःचे अस्तित्व इथंपर्यंत आणलेले आहे. आताही आपण एकोप्याने, एकदिलाने वागून एकमेकाला मदत करीत जगूया. माणसासी माणसाप्रमाणे जगणे आणि निसर्गाची होणारी लूट थांबवणे, एवढे जरी झाले तरी कोरोनाने शिकवलेला तो एक धडा आहे असे म्हणावे लागेल.
स्वस्थ रहो! मस्त रहो!! व्यस्त रहो!!!
(हा लेख मी लिहिलेला नाही.)

Sunday, July 12, 2020

"मानसिक शक्ती" जपून ठेवा.

     आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक घटनांमधून आपल्याला आपली मानसिक शक्ती निर्माण करण्यास मदत मिळत असते. परंतु बऱ्याच वेळा आपल्याकडून चुकून किंवा काही व्यक्तींच्या बाबतीत जाणीवपूर्वक मानसिक खच्चीकरण करण्याची अनेकांची सवय असते. या सवयीमुळे स्वतः च्या आणि इतरांच्या नजरेतून आपल्या विषयीचे मत मतांतर निर्माण होत असते. याचे एक सुंदर उदाहरण म्हणजे हे.
     थंडीचे दिवस होते, डिसेंबरचा शेवट आणि नवीन वर्षाची सुरुवातीचा काळ असावा. हाडे गोठवून टाकणाऱ्या एका कडाक्याच्या थंडीच्या रात्री, एक अब्जाधीश रस्त्यावर एका वृद्ध गरीब माणसाला भेटला. त्याने त्याला विचारले, "तुम्हाला बाहेर थंडी वाटत नाही का? तूम्ही तर थंडीचे स्वेटरही घातलेले नाहीये?"
     तेव्हा त्या गरीब म्हाताऱ्याने उत्तर दिले, "माझ्याकडे गरम स्वेटर नाही परंतु मला थंडीची सवय आहे." अब्जाधीश म्हणाला, "थांबा मी आता घरी जातो आणि तुमच्यासाठी एक चांगले गरम स्वेटर घेऊन येतो."
     थंडीपासून संरक्षण देणारे स्वेटर मिळणार या विचाराने तो गरीब म्हातारा खूप आनंदित झाला आणि म्हणाला की "साहेब खूप उपकार होतील." अब्जाधीश घरी गेल्यावर काही तरी कामात स्वेटर चे विसरून गेला.
     सकाळी त्याला त्या गरीब म्हातार्‍याची आठवण झाल्यावर तो स्वेटर घेऊन तो म्हातारा रात्री ज्या जागी भेटला तिथे गेला. परंतु म्हातारा जीवघेण्या थंडीने कडकडून मरण पावला होता.
   अब्जाधीश माणसाला त्याच्या प्रेताजवळ एक चिट्ठी दिसली. त्याने ती चिठ्ठी वाचली. त्यात लिहिले होते, “साहेब जेव्हा माझ्याजवळ गरम कपडे, स्वेटर नव्हते तेव्हा माझ्याकडे थंडीविरुद्ध लढण्याचे मानसिक शक्ती होती. परंतु जेव्हा तुम्ही मला गरम स्वेटर देण्याचे आश्वासन दिले तेव्हा आता थंडी पासुन संरक्षणासाठी एक छान गरम स्वेटर मिळणार या आशेने माझी थंडी विरुद्ध लढण्याची मानसिक शक्ती संपली."
     जर आपण एखाद्याला दिलेला शब्द, आश्वासन, वचन पाळू शकत नसू तर ते देऊ नका. दिलेला शब्द आपल्यासाठी जरी महत्वाचा नसला तरी तो दुसर्‍या एखाद्या गरीब, लाचार व्यक्तीसाठी बरंच काही असू शकतो. कोणाच्याही भावनांशी, अपेक्षांशी खेळू नका. एखाद्याच्या अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत तरी ठीक आहे, परंतु समोरच्या व्यक्तीला अपेक्षेवर ठेवू नका.
- मंगेश विठ्ठल कोळी.
मो.- 9028713820

Friday, July 10, 2020

माणसं का कामवावीत....

माणसं कमावण्याची जबरदस्त नशा असते वयाच्या एका टप्प्यापर्यंत. आपल्यापैकी अनेकांना ती असते. माणसं जोडणं ही छानच गोष्टय, अनेकांसाठी ती एक अभिमानाची बाब असते. जरूर असावी. चांगला स्वभाव आणि उत्तम चारित्र्य याच्या जोरावर अनेक माणसं जोडावीत, जपावीत. (चांगला स्वभाव म्हणजे बुळेपणा नव्हे. स्वतःचा 'होयबा' करणे तर अजिबात नव्हे.) पण हे करताना ही जपलेली माणसं आपल्यालाही 'जपत' आहेत ना हे बघणं फार महत्त्वाचं असतं. अनेकदा आपल्याला वाटून जातं, अरे बापरे...! ही अमुक इतकी 'भारी' व्यक्ती आपल्यासोबत संपर्क ठेवून आहे. म्हणजे किती छान! त्या संपर्कामागे विशुद्ध भाव आहे ना, की पुढे जाऊन आपला 'स्टेपणी' म्हणून उपयोग केला जाणार आहे हे बघायला हवं. अशा अनेक अनुभवांतून आपण जात असतो, त्यामुळे 'हुरळून' जाणं टाळायला हवं.
    तुम्हाला माणसं जोडावीशी वाटतात हा तुमचा चांगुलपणा असतो, पण त्याला तुमचा भावनिक कमकुवतपणा समजणारे खूप लोक असतात. त्यामुळे आपल्या चांगुलपणाचं इतकंही प्रदर्शन करू नये की तो संशयास्पद वाटू लागेल. 
  अनेकदा एखादी व्यक्ती आपल्याला अत्यंत जवळची, जिवलग वाटत असते, आपली सुख दुःखं आपण तिला सांगत असतो. पण आपल्या वेदनांचा वापर पुढे ती आपलं मन:स्वास्थ्य उद्ध्वस्त करणारा दारुगोळा म्हणून देखील करू शकते. माणसांना इतकंही पोटाशी धरू नये की ते पुढे आपल्यावर लाडाने दुगाण्या झाडू लागतील. माणसं जोडताना कोणाला कोणत्या पायरीपर्यंत जवळ येऊ द्यावं हे ठरवून घ्यायला हवं. लायकी नसलेल्या एखाद्या व्यक्तीला फार जवळ केल्याचा अतोनात त्रास आयुष्यभर भोगावा लागू शकतो.
     लोक तुम्हाला खांदा द्यायला नसतात बसलेले, अनेकदा तुम्ही रडण्यासाठी त्यांचा खांदा जवळ करता, हे त्यांना एंटरटेनिंग वाटू शकतं. दुःखावर बांधावीत अशी माणसं फार विरळा असतात. मन मोठं करून समोरच्याला मदत करणं, त्याचं चांगलं व्हावं यासाठी प्रयत्न करणारी भली माणसं जगात आहेत, नक्कीच आहेत. पण भसाभस माणसं जमवण्याच्या नादात दाण्यांपेक्षा बणग्याच जास्त गोळा होतात. त्यातली एखादी आयुष्यभर कुसळासारखी टोचत राहते, असह्य वेदना देते.
    'भारावून जाणं' ही एक फारच भाबडी गोष्ट आहे. कोणाच्या एवढ्या तेवढ्या गोष्टीने भारावून जाणारी माणसं आपल्यात असतात. फार जवळ जाऊन बघितलं की समोरच्या माणसाचे पायही मातीचे हवेत हे लक्षात येतं आणि अतोनात निराशा वाट्याला येते. माणसांतलं चांगलं ते जरूर वेचावं, त्याचं कौतुक करावं, जमल्यास आचरणातही आणावं. पण आंबा आवडला म्हणजे लगेच झाड उपटून घरात आणण्याचा वेडेपणा आपण करू नये. आंबा खाण्याचा आनंद घ्यावा आणि आपलं 'आपलेपण' आपण टिकवून ठेवावं. आपणच आंब्याचं झाड होण्याचा प्रयत्न करू नये.
    काही माणसं समोरून फार छान वाटतात, आदर्श वाटतात. आपण त्यांना आपलं मनात राहतो, फॉलो करत राहतो. आणि एका विवक्षित क्षणी कळतं, की काहीही घेणं देणं नसताना ही माणसं आपल्यासोबत किती खोटं, कृतक वागत होती, मागे डावपेच करत होती.  मग जीव उबतो, त्या नात्याची शिसारी येऊ लागते. यावर पर्याय काय? 'माणसांच्या फार जवळ न जाणे'. लांबून जे दिसतं त्यात आनंद मानावा. माणसं आपल्या समोर जे वागतात, बोलतात ते आणि तेवढंच खरं मानून पुढे निघावं, फार खोलात जाऊन गोष्टी जाणून घेण्याचा हट्ट करू नये. अपेक्षाभंग वाट्याला येतो.
    माणसं कमावणं म्हणजे त्यांना आपल्या आयुष्यात हस्तक्षेप करण्याचे अधिकार देणं नव्हे. काही व्यक्ती आपलेपणाच्या हक्काने काही गोष्टी सांगत असतात. त्या नम्रपणे ऐकून घेण्याची क्षमता ठेवावी. चार कटू गोष्टी ऐकाव्या लागल्या तरी त्यातून पुढे आपला भलंच होणार आहे हे आपण जाणून असावं. अर्थात आपलं खरोखरच भलं व्हावं म्हणून स्वतःचा वेळ देऊन आपला कान पकडणारं कोण आणि आपलं भलं पाहून पोटदुखी होणारे कोण यातला फरक आपल्याला ओळखता यायला हवा. 
       माणसं जरूर जोडावीत, जपावीत, एकमेकांच्या मदतीनं आयुष्यात पुढे जावं, जीवन प्रवासाचा आनंद घ्यावा. पण उठून सुटून आपल्याला दुखावू शकेल इतके अधिकार कोणाला देऊ नयेत. जगायला माणसं लागतातच, पण 'आतल्या' वर्तुळात कोणती माणसे घ्यायची आणि 'बाहेरच्या' वर्तुळात कोणती माणसं ठेवायची याचं गणित एकदा जमायला लागलं की सोपं होतं जगणं. 
(हा लेख माझा नाही, सुंदर विचार आहेत म्हणून वाचनासाठी देत आहे.)

Friday, June 26, 2020

निंदा करतात हा शुभसंकेत...

तुम्ही गुरु नावाचा चित्रपट पाहिला आहे का? धीरूभाई अंबानींच्या जीवानावरील चित्रपट प्रत्येक उद्योजकाने पाहावा व त्यातील काही डायलॉग बारकाईने समजून घ्यावेत. *“जब लोग तुम्हारे खिलाफ बोलने लगे,* *समझ लो तरक्की कर रहे हो,”* *“अगर पैसा बन सकता है, तो मैने बनाया है,”* *“किस बात से नाराज हो आप लोग,* *मेरी तरक्कीसे या मेरी तरक्की के तेजी से?”* *“मै बापू नहीं हूँ, मै बस अपना धंदा करना जानता हूँ,”* *“मुझे गोल्फ खेलना नही आता, घोडे की रेस भी नहीं खेलता हूँ,* *मैं अपने धंदे का मजबूत खिलाडी हूँ”* हे सर्व डायलॉग धीरूभाईंच्या जीवनचरित्र व विचारसरणीवर आधारित आहेत.
ज्याला आयुष्यात यशस्वी उद्योजक व्हायचे आहे व पैसा कमवायचा आहे, त्यांनी त्या तत्त्वज्ञानाचा (फिलॉसॉफी) अभ्यास करून समजून घेतले पाहिजे. एखाद्या, समाजात, राज्यात, भाऊबंधकीत, नातेवाईकात एखादा जण यश संपादन करतो, पैसा कमवतो, नाव कमवतो, गाड्या घेतो, बंगले बांधतो तेव्हा अशा व्यक्तीबद्दल त्याचे जवळचेच लोक जे आज मागे पडलेले असतात ते वाईट बोलायला सुरू करतात. त्याच्या वैयक्तिक किंवा व्यवसायिक गोष्टी शोधून काढून त्याबद्दल चहाड्या, चुगली, गॉसिप करतात. हे होत त्यांच्या वैफल्यातून, कारण आपल्यातीलच एकजण इतका पुढे निघून गेला व आपण मागे पडलो हे त्यांना सतत बोचत असते.

स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी यशस्वी माणसावर टीका करणे हा सोपा व फुकटचा मार्ग हे लोक स्वीकारतात. जेव्हा तुमच्याबद्दल असे लोक वाईट बोलायला लागतात. तेव्हा तुम्ही आनंद साजरा करा, कारण तुम्ही जीवनात जबरदस्त यशस्वी होत आहात याचा तो शुभसंकेत आहे. जर तुम्ही इतरांबद्दल त्यांच्या पाठीमागे वाईट बोलत असाल, तर तत्काळ स्वत:चे विचार तपासा, कारण हा गुण स्वतःच्या प्रगतीला इतका बाधक आहे, की विचार करण्याच्या दृष्टीने तुम्ही आंधळे झालेले असता. जेव्हा तुम्ही यशस्वी व्यक्तीकडे संपूर्ण सकारात्मक दृष्टीने बघाल, तेव्हाच त्याचे गुण तुम्ही आत्मसात करण्याचा प्रयत्न कराल. जो वेगाने प्रगती करतो तो समाजातील पारंपरिक बाबींना छेद देतो. रूढी, परंपरा बासनात टाकल्यामुळे लोक त्याच्यावर टीका करतात. तुम्ही काही नवीन कराल तेव्हा लोक तुम्हाला वेड्यात काढतील; पण हे लक्षात ठेवा वेडेच इतिहास घडवतात शहाणे तर वाचतात.

*‘लोग तो कहेंगे लोंगो का काम है कहना’* एखाद्या क्षेत्रात जर पैसा असेल, तर तो तुम्ही कमवलाच पाहिजे. जणू काही तो तुम्ही तुमचा हक्कच समजायला हवा. चांगले चाललेल्याच्या घरात लोक काड्या टाकतात. समाजाचा जास्त विचार करत बसला तर आयुष्य बाराच्या भावात गेलेच म्हणून समजा.
(वरील लेख मी लिहिलेला नाही, प्रेरणादायी आहे म्हणून आपणास पाठवत आहे.)

Sunday, June 7, 2020

जे मनात, तेच तोंडात....

आपल्या मराठीमध्ये अनेक चांगल्या म्हणी उपलब्ध आहेत. बऱ्याच म्हणी आपल्याला नक्की काय म्हणायचं आहे हे कमीतकमी शब्दामध्ये सांगण्याचे काम करतात. जसे की, "ढवळ्या शेजारी बांधला पोहळा वाण नाही पण गुण लागला." "जे मन चिंती ते वैरी पण न चिंती." अशा प्रकारच्या म्हणी उच्चारताच आपल्याला नक्की काय म्हणायचे आहे ते समोरच्या व्यक्तीच्या लक्षात येते.
आपल्या आजूबाजूला जे वातावरण असते तसेच आपण घडत असतो. हे सर्वांनी ठाऊक आहे. आपण ज्या व्यक्तींच्या सानिध्यात राहतो किंवा बराच वेळ ज्या ठिकाणी काम करतो, त्याचा परिणाम आपल्या वागण्यातून, बोलण्यातून दिसून येतो. ज्या व्यक्तींच्या सानिध्यात आपण वावरतो त्यांचे बोलणे, चालणे, वागणे, त्यांचा मानसिक, वैचारिक परिणाम आपल्यावर देखील होतो. एखादी मुलगी सतत मुलांच्यामध्ये वावरत असेल तर मुलांच्या तोंडातून निघणारे शब्द त्या मुलीच्या तोंडातून आपसूकच बाहेर पडतात. (मग त्या शिव्या असोत, दादागिरी असो, उलट, उद्धट बोलणे असो वा इतर.) काही ठिकाणी मुलांच्या बाबतीत ही मुलींच्या वातावरणात राहिल्यास त्यांच्या तोंडातून येणारे अनेक शब्द मुलांच्या तोंडातून बाहेर पडतात. (मंजुळ आवाज, हावभाव, इतर.)
मानसशास्त्र सांगते की, आपल्या संगत आणि सोबत कोणाची आहे, यावर आपली वैचारिक शक्ती निर्माण होते. आपल्याकडे पाहण्याचा इतरांचा दृष्टिकोन निर्माण होत असतो. ते कसे हे आपण पुढील उदाहरणातून पाहूया.
एक बांगड्या विकणारे काका होते. गावोगावी फिरून बांगड्या विकायचे. त्यांच्याकडं एक मोठी बांबूची टोपली होती. टोपली डोक्यावर घेऊन इकडून तिकडे जायचे. त्यामध्ये ते बांगड्या अशा पद्धतीने रचायचे की वरचे कापड काढल्यावर सर्व प्रकारच्या बांगड्या ग्राहकांना दिसायच्या. हळूहळू बांगड्यांची विविधता वाढू लागली आणि टोपलीचा आकार वाढू लागला. आता सगळी विविधता त्या टोपलीत मावेना म्हणून त्यांनी एक गाढवी विकत घेतली. तिच्या पाठीवर ठेवता येईल अशी रचना बनवली. बांगडीवाले काका आणि राणी नाव ठेवलेली त्यांची गाढवी गावोगावी फिरताना दिसू लागले. यामध्ये असलेला सर्वात गमतीचा भाग म्हणजे काकांचे राणीशी चाललेले संभाषण. 
पुढे दगड दिसला तर ते म्हणायचे," राणी बेटी, पुढे दगड आहे, थोडे बाजूने चाल."
कधी ती खूपच हळू चालू लागली तर म्हणायचे," अग राणी, थोडे लवकर पाय उचल, गावोगावी माझ्या मुली माझी वाट पाहत आहेत."
राणी कधी वेगाने जाऊ लागली, जे फारच क्वचित व्हायचे तर म्हणायचे," काय बेटी, आज काय हरीण झालीस का? जरा जपून पाय टाक. बांगड्या फुटतील ना!" ते इतक्या प्रेमाने गाढवीशी बोलतात ते काय गाढवीला कळत असेल का याचे आश्चर्य सर्वांना वाटायचे.
एक दिवस एका आजीने त्यांना असे बोलत चालताना पाहिले आणि विचारले, "बाकीचे जे लोक गाढव पाळतात, ते हातात काठी ठेवतात, अधूनमधून गाढवाला मारतात, शिव्या देतात, ओरडतात हे आम्ही पाहिले आहे. पण गाढवीला राणी बेटी म्हणणारे, इतके गोड बोलणारे तुम्ही पहिलेच दिसता. असे कसे काय?"
"आजी, तुम्हाला सांगू का? माझा व्यवसाय आहे बांगड्या विकण्याचा आणि भरण्याचा. माझा संबंध येतो मुली आणि बायकांशी. मी जर राणीला गाढवी म्हणायला लागलो, शिव्या द्यायला लागलो तर माझ्या तोंडात तेच शब्द बसतील. एकदा कुठलाही शब्द आपल्या तोंडात बसला तर अनवधानाने तो कधी बाहेर येईल हे सांगता येत नाही. मग बांगड्या विकताना चुकून असे शब्द माझ्या तोंडातून बाहेर पडतील. मी चुकून असा शब्द गावातल्या मुलींशी, सूनांशी, बायकांशी बोललो तर गावकरी माझे काय करतील? म्हणून मी माझ्या तोंडातून कधीच चुकीचा शब्द येवू देत नाही. माझ्या तोंडाला, मनाला अशा शब्दांची सवयच लागू देत नाही."
ही गोष्ट फक्त धंद्यासाठीच नाही तर आपल्या सर्वांसाठीच अत्यंत उपयुक्त, आवश्यक आहे. आपण कोणतेही शब्द उच्चारत असताना ते शब्द आपल्या फक्त तोंडात असतात असे नाही तर ते आपल्या मनात, विचारात खोलवर कायमचे कोरलेले असतात. आणि कोणत्या तरी अशाच वेळ अनावधानाने ते बाहेर पडतात आणि आपली ओळख कायमची तशीच होते. त्यामुळे आपल्या आजूबाजूला कोण आहेत, त्यांचा वैचारिक आणि मानसिक दृष्टिकोन काय आहे हे नक्की पहा. काही व्यक्ती चुकीच्या वाटत असतील तर त्यांच्यापासून थोडंस दूर राहा. म्हणजे आपला दृष्टिकोन आपोआपच बदलले.
- मंगेश विठ्ठल कोळी.
- मो. 9028713820
- ईमेल mangeshvkoli@gmail.com

Wednesday, June 3, 2020

शिवाजी : नुसतच जय जय..

गेली साडे तीनशे वर्षे शिवाजी महाराजांच्या बाबत अनेक इतिहास संशोधक, जाणकार व्यक्ती, शिवाजी महाराजांच्या बद्दल अभ्यास करण्याऱ्या व्यक्ती यांच्याकडून वेगवेगळ्या गोष्टी ऐकत आलो आहे. त्याचप्रमाणे स्वत:ला पटेल, रुचेल, आवडेल अशा प्रकारे शिवाजी महाराज समजून घेतले जातात. परंतु शिवाजी महाराजांचा खरा इतिहास नक्की काय? त्यावर विविध अभ्यासकांचे एकमत आहे असे कुठेही वाचनास मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या बद्दल ठामपणे सांगणे आताच्या काळात शक्य नाही.
याचे एक चांगले उदाहरण द्यायचे झाले तर काल महाराष्ट्रचे दैवत मानणाऱ्या, अनेकांचे प्रेरणास्थान असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली. आपण ती आनंदाने उत्साहाने साजरी केली. परंतु दुर्दैव हे आहे की, एकाच माणसाची जयंती आज तीन-तीन वेळा साजरी केली जात आहे. (तिथीप्रमाणे, परंपरेप्रमाणे, तारखेप्रमाणे) महाराजांच्या जयंतीला मोठ्या प्रमाणात मिरवणुका काढल्या गेल्या. सगळ्यात मोठी लाजिरवाणी गोष्ट म्हणजे काही ठिकाणी जयंतीच्या मिरवणुकीमध्ये स्वत: शिवाजी महाराजांचे वारस समजणाऱ्या व्यक्ती बिनधास्तपणे वाटेल तशा गाण्यावर, संगीतावर, वाटेल तशा पद्धतीने नृत्य करताना दिसल्या. शरीरावर शिवाजी महाराजांचा पेहराव केलेला पहिला. परंतु आचरणात मात्र खूप मोठ्या प्रमाणावर विरोधाभासही जाणवला. हा एक प्रकारचा शिवाजी महाराजांचा अपमानच म्हणावा लागेल.
असो. आज पुन्हा तिच गोष्ट आपणाला दिसत आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन साजरा केला जाणार आहे. वरील गोष्टीं पुन्हा होऊ नयेत. एवढीच माफक अपेक्षा आहे. 
'हिंदू धर्मरक्षक' म्हणून शिवाजी महाराजांना बिरुदावली लावणाऱ्या आजच्या तमाम मतलबी धर्मांधांनी ही गोष्ट विसरू नये की, याच हिंदू धर्माने व याच धर्माच्या रक्षकांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायला विरोध केला होता व ४४व्या वर्षी मुंज आणि एकदा झालेला विवाह पुन्हा दुसऱ्यांदा करणे असल्या हास्यास्पद गोष्टी करविल्या होत्या.
अर्थात हिंदू धर्म मानणाऱ्या शिवाजी महाराजांनासुद्धा या काळाच्या आणि धर्माच्या मर्यादा होत्या. प्रत्येक थोर पुरुषाला काळाच्या मर्यादा असतात, परिस्थितीच्या मर्यादा असतात. तशा त्या शिवाजी महाराजांनासुद्धा होत्या.
शिवाजी महाराजांच्या समकालीनांपेक्षा किती लांब पल्ल्याचा विचार करी हे महत्त्वाचे. त्या परिस्थितीतही त्यांनी किती दूरदृष्टीचा विचार केला आणि त्या परिस्थितीतही त्यांनी किती प्रगतिशील पावले उचलली, राजा असूनही रयतेची कशी कदर केली हे महत्त्वाचे.
शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक रायगडावर शके १५९६ ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीस म्हणजे ६ जून १६७४ रोजी झाला हे बहुतेक सर्वांना ठाऊक आहे. परंतु शिवाजी महाराजांचा आणखी एक दुसरा राज्याभिषेक झाला होता. तो पहिल्या राज्याभिषेकानंतर लगेच साधारणत: तीन महिन्यांनी ललिता पंचमीच्या दिवशी म्हणजे अश्विन शुद्ध पंचमीस झाला होता.
निश्चलपुरी गोसावी या नावाचा कुणी यजुर्वेदी तांत्रिक गोसावी होता. पहिल्या राज्याभिषेकानंतर तो शिवाजी महाराजांना भेटला. दरम्यान पहिल्या राज्याभिषेकानंतर १३ दिवसांनी शिवाजी महाराजांची थोर आई जिजाबाई यांचे निधन झाले होते. शिवाजी महाराजांचा सेनापती प्रतापराव गुर्जर वारला होता. शिवाजी महाराजांची एक पत्नी काशिबाई मृत्यू पावल्या होत्या. ह्या सर्व गोष्टी पहिला राज्याभिषेक करताना गागाभट्टाने चुका केल्या म्हणून घडल्या असे या निश्चिलपुरीचे म्हणणे होते. त्याने मुहूर्त बरोबर काढला नव्हता, उपदेवतांना संतुष्ट केले नव्हते, त्यांना बळीचे दान दिले नव्हते. त्यामुळे ह्या आपत्ती ओढवल्या असे त्यांचे म्हणणे होते.
शिवाजी महाराज व त्यांचे सल्लागार हे धर्मश्रद्ध व पापभिरू होते. त्या सर्वांना त्या काळातील जाणिवांच्या व ज्ञानाच्या मर्यादा होत्या. त्यांनी निश्चिलपुरीचे म्हणणे मान्य केले आणि मग पुन्हा दुसरा राज्याभिषेक झाला. पुन्हा उरल्यासुरल्या देवदेवतांना यज्ञ करून व दाने देऊन संतुष्ट केले गेले. ब्राह्मणांना पुन्हा दक्षिणा देण्यात आल्या.३९ एकाच व्यक्तीचे दोन राज्याभिषेक झाल्याचे कुठेच ऐकिवात नाही.
अर्थात दोन दोन राज्याभिषेक करून आणि दोन दोन वेळा देवदेवता व ब्राह्मण पुरोहितांना संतुष्ट करूनही उपयोग झालेला दिसत नाही. राज्याभिषेकानंतर स्वत: शिवाजी महाराजांना जेमतेम सहा वर्षेच आयुष्य मिळाले व तसे ते अकालीच मृत्यू पावले. काळाच्या व तत्कालीन जाणिवांच्या मर्यादा लक्षात घेऊनच या दोन राज्याभिषेकांकडे पाहायचे ऐवढेच तात्पर्य.
शिवाजी महाराज यांची दूरदृष्टी प्रत्येकाने पाहायला हवी, आत्मसात करायला हवी. शिवाजी महाराजांना लहानपणी ज्यांनी ज्यांनी घडविले. त्या सर्वांच्या कष्टाचे फळ म्हणजेच ते शिवाजी पासून छत्रपती शिवाजी महाराज झाले. त्यांच्या अंगी असणारे विविध गुणकौशल्य आजच्या पिढीने आत्मसात केले पाहिजे. कोणतेही कार्य करत असताना त्याचे विविध पर्याय शोधले पाहिजेत. एक पर्याय चुकीचा ठरला तर दुसरा आणि दुसराही चुकीचा ठरला तर तिसरा पर्याय आपल्याकडे उपलब्ध असावा. फक्त शिवाजी महाराज की, म्हटल्यावर “नुसतंच जय जय म्हणून काहीही उपयोग होत नाही, होणार नाही. हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे.
(या लेखात ठळक केलेल्या ओळी गोविंद पानसरेलिखित शिवाजी कोण होता?” या पुस्तकातील आहेत.)
- मंगेश विठ्ठल कोळी.
- मो. ९०२८७१३८२०
- ईमेल mangeshvkoli@gmail.com
(Mangesh Koli) माझे असे प्रेरणादायी विचार मिळविण्यासाठी व्हॉटसअप, फेसबुक, ट्विटर, ब्लॉग, टेलिग्राम, इन्स्टाग्राम चॅनेलवर फॉलो करू शकता.