Tuesday, August 1, 2017

आयटीआय ऑनलाइन


आज सर्वत्रच दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्यात आयटीआय प्रशिक्षण घेण्याची ओढ वाढत आहेत. याचे कारण म्हणजे शासनच्या अनेक विभागामधील वर्ग ३ व ४ स्तरावरील पदे ही आयटीआय उत्तीर्णांसाठी राखीव ठेवली आहेत. तिथे फक्त आयटीआय उत्तीर्णानच काम करण्याची संधी दिली जाते. राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरु करण्यात आली असून त्यापुढे जात आता आयटीआयच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. सध्या याबाबतची तयारी सुरु असून जानेवारी २०१८ पासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
केंद्र शासनाच्या शिकाऊ उमेदवारी कायदा १९६१ मध्ये सुधारणा करण्यात आली असून महाराष्ट्रातील युवकांना जास्तीत जास्त प्रेन्टीसशिप मिळवून देण्यात महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. प्रेन्टीस क्टमधील सुधारणेमुळे राज्यातील युवकांना अधिकाधिक रोजगार आणि स्वयंरोजगार देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास मदत होणार आहे. कौशल्य विकास कार्यक्रमात धोरणात्मक सुधारणेअंतर्गत राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषदेला स्वायत्ता प्रदान करण्यात आली आहे. कौशल्य विकास संस्थाचे नोंदणीकरण, १५ ते ४५ वयोगटातील युवक युवतींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण, शेतकऱ्यांसाठी कृषी आणि संलग्न क्षेत्रातील व्यवसाय प्रशिक्षणासाठी विविध योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळादवारे आर्थिकदृष्टया मागास घटकांना मदत, तांत्रिक प्रशिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या व्याप्तीत वाढ अशा विविध विषयात कौशल्य विकास विभागाने आघाडी घेतली आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या पुढाकारातून राज्यातील शासकीय आयटीआयचे सामाजिक उत्तरदायित्व निधीतून आधुनिकीकरण होत असून ही निश्चित कौतुकाची बाब आहे. राज्यातील कौशल्य विकास विभागाचे काम नियोजनबद्ध पध्दतीने सुरु असून आयटीआयच्या गुणवत्तेत महाराष्ट्र आघाडीवर आहे. आगामी काळात कौशल्य विकास विभागाने स्वयं वर्गवारीसाठी प्रयत्न करायला हवेत. लघू सत्र कौशल्य प्रशिक्षणही जिल्ह्यांमध्ये देण्यात येण्यासाठी केंद्रामार्फत सहकार्य करण्यात आले पाहिजे.
कौशल्य विकास विभागामार्फत २०२२ पर्यंत महाराष्ट्रात सुमारे ४.५० कोटी मनुष्यबळाचे कौशल्य विकसित करण्याच्या दृष्टीने कौशल्य विकासाचे कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. याअंतर्गत अधिकाधिक रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार असून दरवर्षी ३ लाख युवकांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. लवकरात लवकर नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी केला जात आहे. आजच्या तरुणांनी ही बदलत्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून स्वत:च्या बुद्धिमत्तेचा विकास करायला हवा.

-         मंगेश विठ्ठल कोळी.
-         मो. ९०२८७१३८२०

No comments:

Post a Comment