Monday, October 23, 2017

बोले तैसे चाले, त्याची वंदावी....



काल संध्याकाळी ऑफिसमधून साडेसातच्या सुमारास घरी परतण्यास निघालो. चर्चगेट रेल्वे स्टेशनला पायीच चालत जात होतो. त्यावेळी १ नंबर फलाटावरती वांद्रे गाडी लागल्याचा आवाज कानी आला. मी मनात ठरवले कि आपण याच गाडीने गेलो तर लवकर पोहोचेन आणि त्या गाडीला गर्दीही कमी असते. कारण पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकातील सर्वात जवळचे अंतर असणारी रेल्वे म्हणजे चर्चगेट ते वांद्रे हि आहे. त्यासाठी मी फलाट क्रमांक १ वर उभी असणारी गाडी पकडण्यासाठी भरभर पाऊले टाकू लागलो. तेंव्हा नुकतीच एक वांद्रे रेल्वे माझ्या समोरून पास होत होती. मी धावत जाऊन त्या रेल्वेमध्ये बसण्याचा प्रयत्न केला परंतु शक्य नाही झाले. मग मी दुसरी रेल्वे येण्याची वाट पाहत उभा राहिलो.
फलाट क्रमांक २ वर बोरविली जाणारी रेल्वे लागली. त्या रेल्वेला खूप गर्दी असल्यामुळे मी दुसऱ्या रेल्वेची वाट पाहू लागलो. तेवढ्यात फलाट क्रमांक १ वर अंधेरीला जाणारी रेल्वे च्या घोषणेचा आवाज झाला. मी त्या गाडीची वाट पाहू लागलो. त्यावेळी माझ्या जवळ उभा असणाऱ्या एक व्यक्तीचे फोन वरचे संभाषण ऐकू आले. तो कोणाला तरी सांगत होता कि आज दिवाळी नंतर ऑफिसचा पहिला दिवस होता, दिवाळीचा फराळ घेऊन ऑफिसला गेलो होतो सर्वांनी मिळून खूप आनंदाने तो खाल्ला. माझ्या ऑफिस मध्ये साफ सफाई करणाऱ्या बाहेरील राज्यातील एक व्यक्तीला दिवाळी फराळ दिला मनाला खूप छान वाटले. तो व्यक्ती खूप आनंदी होता, एखादा व्यक्ती आपल्या साठी एवढी कामे करतो बिचार किती थकत असेल. त्याला आमच्या बरोबर अड्जेस्ट करून घेतले. आम्हाला हि त्याच्या आनंदामध्ये सामील झाल्याचे समाधान होते. वगैरे वगैरे असा संवाद सुरु होता.
तेवढ्यात अंधेरीला जाणारी रेल्वे समोर येऊन उभा राहिली. मी त्या रेल्वेत जाऊन बसलो. थोड्या वेळापूर्वी फोनवर बोलणारा तो व्यक्ती सुद्धा रेल्वेत माझ्या समोरील बाकड्यावर येऊन बसला. रेल्वे सुटे पर्यंत आमच्या आजू बाजूच्या सीटवरील जागा पूर्ण भरल्या. त्या व्यक्तीच्या शेजारी एक २५ वयाच्या आसपास असणारा मुलगा बसला होता. हातात खूप ओझ होत. त्याने ते ओझ त्याच्या दोन्ही पायाच्या मध्ये पकडले. रेल्वे सुरु झाली. थोडं अंतर गेल्यानंतर त्या मुलाला झोप येऊ लागली. कदाचित दिवसभरातील कष्टाने थकलेला असावा. तो मुलगा झोपेत असताना त्याच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीच्या खांद्याला सारखे त्याचे डोके लागत होते. तो व्यक्ती खूप रागाने आणि तिरस्काराने त्याच्याकडे बघत होता. परंतु तो मुलगा खूपच थकल्यामुळे स्वत:ला झोपेतून सावरू शकत नव्हता. लोअर परळ जवळ गेल्यावर त्या व्यक्तीने रागाने त्या मुलाचे डोके हाताने बाजूला करत खूप मोठ मोठ्याने ओरडायला सुरुवात केली. आणि म्हणू लागला अशा माणसांना जवळ बसून घेतले कि जास्त त्रास होतो वगैरे वगैरे खूप बडबड करू लागला. त्याची हि बडबड वायफळ आणि सर्वाना नकोशी वाटत होती.
त्यावेळी मला थोड्या वेळापूर्वी त्याचे फोन वरील संभाषण आणि त्या व्यक्तीच्या आताच्या वागण्यातील तफावत खूप मोठी असल्याचे जाणवले. अशा अनेक व्यक्ती आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात. एका बाजूला सहानभूती दाखवायची आणि दुसऱ्या बाजूला असहानभूती. ऑफिस मधील साफसफाई करणाऱ्या व्यक्तीला केलेली मदत तो थकत असेल हि भावना, आणि इथे दिवसभर कष्ट करून थकलेला तो मुलगा हि वास्तवता. त्या व्यक्तीच्या विचारातील आणि वागण्यातील हा दुटप्पी पणा पाहून असे वाटले कि, “बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले.” हि मराठीतील म्हण आज फक्त ऐकायला छान वाटत, कृतीत मात्र दिसत नाही.
-       मंगेश विठ्ठल कोळी.
-       मो. ९०२८७१३८२०

2 comments:

  1. खरच ,नेहमी असंच काही पहायला मिळत असत. फार वाईट वाटत.

    ReplyDelete
  2. छान लिहिला हा लेख,अभिनंदन मंगेश

    ReplyDelete