Friday, April 19, 2019

असून अडचण, नसून खोळंबा...

महाभारतात कर्ण हि व्यक्तीरेखा "असून अडचण व नसून खोळंबा"  या तत्वात बसणारी आहे.  मी इतरांच्या पेक्षा वेगळा आहे? मी अद्भुत आहे? आणि मी असामान्य व्यक्ती आहे? हे लहानपणापासून जाणले असतानाही त्या व्यक्तीरेखेनी स्वतःला संकुचित ठेवले.
तो अजेय होता, तसेच जो पर्यंत त्याच्याकडे कवच-कुंडले आहेत तो पर्यंत त्याला कोणीही युद्धात हरवू शकणार नाही याची जाणीव आसताना, त्याने दुर्योधनाने दिलेल्या राजपद  स्वीकारण्यापेक्षा मनगटाच्या जोरावर मिळवण्याचा का प्रयत्न केला नाही? त्याने ठरवले असते तर कितीतरी राज्ये युद्धात जिंकून तो स्वामी होऊ शकला असता, त्याची तशी कधी महत्वाकांक्षा दिसून आलीच नाही. 
अचाट शक्ती व  शूरवीर असूनही स्वतःच्या कौशल्याने, वेळप्रसंगी  युद्ध करून जिंकून घेण्याचा त्याच्यात कधी मानस  दिसला नाही. याला कारण ही कदाचित एकच होते, केवळ अर्जुनाशी वैर, कारण तोच एक धनुर्धर हा कर्णाशी लढाई करण्याच्या ताकदीचा मानला जात होता. जो पर्यंत कवच-कुंडले आहेत तो पर्यंत अर्जुनाने मारलेल्या कोणत्याच अस्त्राचा त्यावर प्रभाव होणार न्हवता हे माहित असूनही उगीचच अर्जुनाशी वैर दाखवून पांडव कुळाशी वैर केले. उलट अर्जुन माझ्याशी लढण्याच्या कुवतीचा नाही त्यामुळे मी त्याला माझा प्रतिस्पर्धी मानतच नाही, हे ठरवून पुढे गेला असता तर नक्कीच अजून मोठा झाला असता, किंबहुना महाभारतात कृष्णानंतर श्रेष्ठत्वात त्याचाच नंबर लागला असता. 
कर्ण मनात केवळ अर्जुनावर वैर धरून जगला इथेच चुकला, त्यामुळे त्याला इतर चांगल्या गोष्टींची जाणीव झालीच नाही, किंबहुना स्वतःच्या कोशात अडकून राहिला, अगदी शेवटी सुद्धा जेव्हा कुंती त्याला सर्व काही सांगते, त्या नंतरही तो तिला एकच उत्तर देतो, तुझे पाच पांडव जिवंत राहतील. त्याच्या याच गुणांचा गैरफायदा दुर्योधनाने घेतला, व त्याला स्वतःच्या बचावासाठी  वापरून घेतले. 
प्रत्येकाच्या मनात असाच एक कर्ण लपलेला असतोच. कर्ण आहे म्हणजे कवच कुंडले आलीच ना! हि कवच कुंडले म्हणजे, आपले चांगले गुण, आपल्यात दडलेली उत्कृष्ठ कला, जसे चित्रकला, गायन, मैदानी खेळाडू, संगीत, लेखन, अभिनय, भाषण, किर्तन, या शिवाय चिकाटीने कोणत्याही विषयावर अभ्यास करण्याची वृत्ती, हे गुण असतानाही त्याकडे लक्ष न देता, आपण आसपास एक अर्जुन शोधत असतो ज्याच्याशी  हेवेदावे, असूया, राग, रुसवा, द्वेष, मत्सर, करत असतो यात आपले वाईट गुण  चांगल्या गुणांना दाबून वर उफाळून येतात. 
चांगल्या गुणांचा स्वतःच्या उद्धारासाठी कसा फायदा करून घेता येईल हे न ओळखता, उगीच क्लेषदायी जीवन जगतो, यातून स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याचा अनेक संधी आपण केवळ वेगळाच विचार करत असल्यामुळे सुटून जातात किव्वा सोडून देतो. बहुतेक वेळेस द्वेषामुळे बदला घेण्याची वृत्ती जागी होते, आणि प्रतिशोध घेण्याकडे कल जातो, त्यातून अघटित घडते, म्हणजे ज्यावर लक्ष केंद्रित करायला हवे ते न करता दुसरीकडे उत्तर शोधत फिरतो, त्यामुळे ही आपण अपयशाचे धनी होतो.
असा कर्ण मनात ठाण मांडून असल्यामुळेदुर्योधन, शकुनी मामा त्यांना जवळ करतात, आणि मग सुरु होते  विनाशयुती, जी नेहेमीच  नाशाकडे घेऊन जाते.
(हा लेख मी लिहिलेला नाही)
-   मंगेश विठ्ठल कोळी, मो. ९०२८७१३८२०