Friday, June 26, 2020

निंदा करतात हा शुभसंकेत...

तुम्ही गुरु नावाचा चित्रपट पाहिला आहे का? धीरूभाई अंबानींच्या जीवानावरील चित्रपट प्रत्येक उद्योजकाने पाहावा व त्यातील काही डायलॉग बारकाईने समजून घ्यावेत. *“जब लोग तुम्हारे खिलाफ बोलने लगे,* *समझ लो तरक्की कर रहे हो,”* *“अगर पैसा बन सकता है, तो मैने बनाया है,”* *“किस बात से नाराज हो आप लोग,* *मेरी तरक्कीसे या मेरी तरक्की के तेजी से?”* *“मै बापू नहीं हूँ, मै बस अपना धंदा करना जानता हूँ,”* *“मुझे गोल्फ खेलना नही आता, घोडे की रेस भी नहीं खेलता हूँ,* *मैं अपने धंदे का मजबूत खिलाडी हूँ”* हे सर्व डायलॉग धीरूभाईंच्या जीवनचरित्र व विचारसरणीवर आधारित आहेत.
ज्याला आयुष्यात यशस्वी उद्योजक व्हायचे आहे व पैसा कमवायचा आहे, त्यांनी त्या तत्त्वज्ञानाचा (फिलॉसॉफी) अभ्यास करून समजून घेतले पाहिजे. एखाद्या, समाजात, राज्यात, भाऊबंधकीत, नातेवाईकात एखादा जण यश संपादन करतो, पैसा कमवतो, नाव कमवतो, गाड्या घेतो, बंगले बांधतो तेव्हा अशा व्यक्तीबद्दल त्याचे जवळचेच लोक जे आज मागे पडलेले असतात ते वाईट बोलायला सुरू करतात. त्याच्या वैयक्तिक किंवा व्यवसायिक गोष्टी शोधून काढून त्याबद्दल चहाड्या, चुगली, गॉसिप करतात. हे होत त्यांच्या वैफल्यातून, कारण आपल्यातीलच एकजण इतका पुढे निघून गेला व आपण मागे पडलो हे त्यांना सतत बोचत असते.

स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी यशस्वी माणसावर टीका करणे हा सोपा व फुकटचा मार्ग हे लोक स्वीकारतात. जेव्हा तुमच्याबद्दल असे लोक वाईट बोलायला लागतात. तेव्हा तुम्ही आनंद साजरा करा, कारण तुम्ही जीवनात जबरदस्त यशस्वी होत आहात याचा तो शुभसंकेत आहे. जर तुम्ही इतरांबद्दल त्यांच्या पाठीमागे वाईट बोलत असाल, तर तत्काळ स्वत:चे विचार तपासा, कारण हा गुण स्वतःच्या प्रगतीला इतका बाधक आहे, की विचार करण्याच्या दृष्टीने तुम्ही आंधळे झालेले असता. जेव्हा तुम्ही यशस्वी व्यक्तीकडे संपूर्ण सकारात्मक दृष्टीने बघाल, तेव्हाच त्याचे गुण तुम्ही आत्मसात करण्याचा प्रयत्न कराल. जो वेगाने प्रगती करतो तो समाजातील पारंपरिक बाबींना छेद देतो. रूढी, परंपरा बासनात टाकल्यामुळे लोक त्याच्यावर टीका करतात. तुम्ही काही नवीन कराल तेव्हा लोक तुम्हाला वेड्यात काढतील; पण हे लक्षात ठेवा वेडेच इतिहास घडवतात शहाणे तर वाचतात.

*‘लोग तो कहेंगे लोंगो का काम है कहना’* एखाद्या क्षेत्रात जर पैसा असेल, तर तो तुम्ही कमवलाच पाहिजे. जणू काही तो तुम्ही तुमचा हक्कच समजायला हवा. चांगले चाललेल्याच्या घरात लोक काड्या टाकतात. समाजाचा जास्त विचार करत बसला तर आयुष्य बाराच्या भावात गेलेच म्हणून समजा.
(वरील लेख मी लिहिलेला नाही, प्रेरणादायी आहे म्हणून आपणास पाठवत आहे.)

Sunday, June 7, 2020

जे मनात, तेच तोंडात....

आपल्या मराठीमध्ये अनेक चांगल्या म्हणी उपलब्ध आहेत. बऱ्याच म्हणी आपल्याला नक्की काय म्हणायचं आहे हे कमीतकमी शब्दामध्ये सांगण्याचे काम करतात. जसे की, "ढवळ्या शेजारी बांधला पोहळा वाण नाही पण गुण लागला." "जे मन चिंती ते वैरी पण न चिंती." अशा प्रकारच्या म्हणी उच्चारताच आपल्याला नक्की काय म्हणायचे आहे ते समोरच्या व्यक्तीच्या लक्षात येते.
आपल्या आजूबाजूला जे वातावरण असते तसेच आपण घडत असतो. हे सर्वांनी ठाऊक आहे. आपण ज्या व्यक्तींच्या सानिध्यात राहतो किंवा बराच वेळ ज्या ठिकाणी काम करतो, त्याचा परिणाम आपल्या वागण्यातून, बोलण्यातून दिसून येतो. ज्या व्यक्तींच्या सानिध्यात आपण वावरतो त्यांचे बोलणे, चालणे, वागणे, त्यांचा मानसिक, वैचारिक परिणाम आपल्यावर देखील होतो. एखादी मुलगी सतत मुलांच्यामध्ये वावरत असेल तर मुलांच्या तोंडातून निघणारे शब्द त्या मुलीच्या तोंडातून आपसूकच बाहेर पडतात. (मग त्या शिव्या असोत, दादागिरी असो, उलट, उद्धट बोलणे असो वा इतर.) काही ठिकाणी मुलांच्या बाबतीत ही मुलींच्या वातावरणात राहिल्यास त्यांच्या तोंडातून येणारे अनेक शब्द मुलांच्या तोंडातून बाहेर पडतात. (मंजुळ आवाज, हावभाव, इतर.)
मानसशास्त्र सांगते की, आपल्या संगत आणि सोबत कोणाची आहे, यावर आपली वैचारिक शक्ती निर्माण होते. आपल्याकडे पाहण्याचा इतरांचा दृष्टिकोन निर्माण होत असतो. ते कसे हे आपण पुढील उदाहरणातून पाहूया.
एक बांगड्या विकणारे काका होते. गावोगावी फिरून बांगड्या विकायचे. त्यांच्याकडं एक मोठी बांबूची टोपली होती. टोपली डोक्यावर घेऊन इकडून तिकडे जायचे. त्यामध्ये ते बांगड्या अशा पद्धतीने रचायचे की वरचे कापड काढल्यावर सर्व प्रकारच्या बांगड्या ग्राहकांना दिसायच्या. हळूहळू बांगड्यांची विविधता वाढू लागली आणि टोपलीचा आकार वाढू लागला. आता सगळी विविधता त्या टोपलीत मावेना म्हणून त्यांनी एक गाढवी विकत घेतली. तिच्या पाठीवर ठेवता येईल अशी रचना बनवली. बांगडीवाले काका आणि राणी नाव ठेवलेली त्यांची गाढवी गावोगावी फिरताना दिसू लागले. यामध्ये असलेला सर्वात गमतीचा भाग म्हणजे काकांचे राणीशी चाललेले संभाषण. 
पुढे दगड दिसला तर ते म्हणायचे," राणी बेटी, पुढे दगड आहे, थोडे बाजूने चाल."
कधी ती खूपच हळू चालू लागली तर म्हणायचे," अग राणी, थोडे लवकर पाय उचल, गावोगावी माझ्या मुली माझी वाट पाहत आहेत."
राणी कधी वेगाने जाऊ लागली, जे फारच क्वचित व्हायचे तर म्हणायचे," काय बेटी, आज काय हरीण झालीस का? जरा जपून पाय टाक. बांगड्या फुटतील ना!" ते इतक्या प्रेमाने गाढवीशी बोलतात ते काय गाढवीला कळत असेल का याचे आश्चर्य सर्वांना वाटायचे.
एक दिवस एका आजीने त्यांना असे बोलत चालताना पाहिले आणि विचारले, "बाकीचे जे लोक गाढव पाळतात, ते हातात काठी ठेवतात, अधूनमधून गाढवाला मारतात, शिव्या देतात, ओरडतात हे आम्ही पाहिले आहे. पण गाढवीला राणी बेटी म्हणणारे, इतके गोड बोलणारे तुम्ही पहिलेच दिसता. असे कसे काय?"
"आजी, तुम्हाला सांगू का? माझा व्यवसाय आहे बांगड्या विकण्याचा आणि भरण्याचा. माझा संबंध येतो मुली आणि बायकांशी. मी जर राणीला गाढवी म्हणायला लागलो, शिव्या द्यायला लागलो तर माझ्या तोंडात तेच शब्द बसतील. एकदा कुठलाही शब्द आपल्या तोंडात बसला तर अनवधानाने तो कधी बाहेर येईल हे सांगता येत नाही. मग बांगड्या विकताना चुकून असे शब्द माझ्या तोंडातून बाहेर पडतील. मी चुकून असा शब्द गावातल्या मुलींशी, सूनांशी, बायकांशी बोललो तर गावकरी माझे काय करतील? म्हणून मी माझ्या तोंडातून कधीच चुकीचा शब्द येवू देत नाही. माझ्या तोंडाला, मनाला अशा शब्दांची सवयच लागू देत नाही."
ही गोष्ट फक्त धंद्यासाठीच नाही तर आपल्या सर्वांसाठीच अत्यंत उपयुक्त, आवश्यक आहे. आपण कोणतेही शब्द उच्चारत असताना ते शब्द आपल्या फक्त तोंडात असतात असे नाही तर ते आपल्या मनात, विचारात खोलवर कायमचे कोरलेले असतात. आणि कोणत्या तरी अशाच वेळ अनावधानाने ते बाहेर पडतात आणि आपली ओळख कायमची तशीच होते. त्यामुळे आपल्या आजूबाजूला कोण आहेत, त्यांचा वैचारिक आणि मानसिक दृष्टिकोन काय आहे हे नक्की पहा. काही व्यक्ती चुकीच्या वाटत असतील तर त्यांच्यापासून थोडंस दूर राहा. म्हणजे आपला दृष्टिकोन आपोआपच बदलले.
- मंगेश विठ्ठल कोळी.
- मो. 9028713820
- ईमेल mangeshvkoli@gmail.com

Wednesday, June 3, 2020

शिवाजी : नुसतच जय जय..

गेली साडे तीनशे वर्षे शिवाजी महाराजांच्या बाबत अनेक इतिहास संशोधक, जाणकार व्यक्ती, शिवाजी महाराजांच्या बद्दल अभ्यास करण्याऱ्या व्यक्ती यांच्याकडून वेगवेगळ्या गोष्टी ऐकत आलो आहे. त्याचप्रमाणे स्वत:ला पटेल, रुचेल, आवडेल अशा प्रकारे शिवाजी महाराज समजून घेतले जातात. परंतु शिवाजी महाराजांचा खरा इतिहास नक्की काय? त्यावर विविध अभ्यासकांचे एकमत आहे असे कुठेही वाचनास मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या बद्दल ठामपणे सांगणे आताच्या काळात शक्य नाही.
याचे एक चांगले उदाहरण द्यायचे झाले तर काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रचे दैवत मानणाऱ्या, अनेकांचे प्रेरणास्थान असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली. आपण ती आनंदाने उत्साहाने साजरी केली. परंतु दुर्दैव हे आहे की, एकाच माणसाची जयंती आज तीन-तीन वेळा साजरी केली जात आहे. (तिथीप्रमाणे, परंपरेप्रमाणे, तारखेप्रमाणे) महाराजांच्या जयंतीला मोठ्या प्रमाणात मिरवणुका काढल्या गेल्या. सगळ्यात मोठी लाजिरवाणी गोष्ट म्हणजे काही ठिकाणी जयंतीच्या मिरवणुकीमध्ये स्वत: शिवाजी महाराजांचे वारस समजणाऱ्या व्यक्ती बिनधास्तपणे वाटेल तशा गाण्यावर, संगीतावर, वाटेल तशा पद्धतीने नृत्य करताना दिसल्या. शरीरावर शिवाजी महाराजांचा पेहराव केलेला पहिला. परंतु आचरणात मात्र खूप मोठ्या प्रमाणावर विरोधाभासही जाणवला. हा एक प्रकारचा शिवाजी महाराजांचा अपमानच म्हणावा लागेल.
असो. आज पुन्हा तिच गोष्ट आपणाला दिसत आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन साजरा केला जाणार आहे. वरील गोष्टीं पुन्हा होऊ नयेत. एवढीच माफक अपेक्षा आहे. 
'हिंदू धर्मरक्षक' म्हणून शिवाजी महाराजांना बिरुदावली लावणाऱ्या आजच्या तमाम मतलबी धर्मांधांनी ही गोष्ट विसरू नये की, याच हिंदू धर्माने व याच धर्माच्या रक्षकांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायला विरोध केला होता व ४४व्या वर्षी मुंज आणि एकदा झालेला विवाह पुन्हा दुसऱ्यांदा करणे असल्या हास्यास्पद गोष्टी करविल्या होत्या.
अर्थात हिंदू धर्म मानणाऱ्या शिवाजी महाराजांनासुद्धा या काळाच्या आणि धर्माच्या मर्यादा होत्या. प्रत्येक थोर पुरुषाला काळाच्या मर्यादा असतात, परिस्थितीच्या मर्यादा असतात. तशा त्या शिवाजी महाराजांनासुद्धा होत्या.
शिवाजी महाराजांच्या समकालीनांपेक्षा किती लांब पल्ल्याचा विचार करी हे महत्त्वाचे. त्या परिस्थितीतही त्यांनी किती दूरदृष्टीचा विचार केला आणि त्या परिस्थितीतही त्यांनी किती प्रगतिशील पावले उचलली, राजा असूनही रयतेची कशी कदर केली हे महत्त्वाचे.
शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक रायगडावर शके १५९६ ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीस म्हणजे ६ जून १६७४ रोजी झाला हे बहुतेक सर्वांना ठाऊक आहे. परंतु शिवाजी महाराजांचा आणखी एक दसरा राज्याभिषेक झाला होता. तो पहिल्या राज्याभिषेकानंतर लगेच साधारणत: तीन महिन्यांनी ललिता पंचमीच्या दिवशी म्हणजे अश्विन शुद्ध पंचमीस झाला होता.
निश्चलपुरी गोसावी या नावाचा कुणी यजुर्वेदी तांत्रिक गोसावी होता. पहिल्या राज्याभिषेकानंतर तो शिवाजी महाराजांना भेटला. दरम्यान पहिल्या राज्याभिषेकानंतर १३ दिवसांनी शिवाजी महाराजांची थोर आई जिजाबाई यांचे निधन झाले होते. शिवाजी महाराजांचा सेनापती प्रतापराव गुर्जर वारला होता. शिवाजी महाराजांची एक पत्नी काशिबाई मृत्यू पावल्या होत्या. ह्या सर्व गोष्टी पहिला राज्याभिषेक करताना गागाभट्टाने चुका केल्या म्हणून घडल्या असे या निश्चिलपुरीचे म्हणणे होते. त्याने मुहूर्त बरोबर काढला नव्हता, उपदेवतांना संतुष्ट केले नव्हते, त्यांना बळीचे दान दिले नव्हते. त्यामुळे ह्या आपत्ती ओढवल्या असे त्यांचे म्हणणे होते.
शिवाजी महाराज व त्यांचे सल्लागार हे धर्मश्रद्ध व पापभिरू होते. त्या सर्वांना त्या काळातील जाणिवांच्या व ज्ञानाच्या मर्यादा होत्या. त्यांनी निश्चिलपुरीचे म्हणणे मान्य केले आणि मग पुन्हा दुसरा राज्याभिषेक झाला. पुन्हा उरल्यासुरल्या देवदेवतांना यज्ञ करून व दाने देऊन संतुष्ट केले गेले. ब्राह्मणांना पुन्हा दक्षिणा देण्यात आल्या.३९ एकाच व्यक्तीचे दोन राज्याभिषेक झाल्याचे कुठेच ऐकिवात नाही.
अर्थात दोन दोन राज्याभिषेक करून आणि दोन दोन वेळा देवदेवता व ब्राह्मण पुरोहितांना संतुष्ट करूनही उपयोग झालेला दिसत नाही. राज्याभिषेकानंतर स्वत: शिवाजी महाराजांना जेमतेम सहा वर्षेच आयुष्य मिळाले व तसे ते अकालीच मृत्यू पावले. काळाच्या व तत्कालीन जाणिवांच्या मर्यादा लक्षात घेऊनच या दोन राज्याभिषेकांकडे पाहायचे ऐवढेच तात्पर्य.
शिवाजी महाराज यांची दूरदृष्टी प्रत्येकाने पाहायला हवी, आत्मसात करायला हवी. शिवाजी महाराजांना लहानपणी ज्यांनी ज्यांनी घडविले. त्या सर्वांच्या कष्टाचे फळ म्हणजेच ते शिवाजी पासून छत्रपती शिवाजी महाराज झाले. त्यांच्या अंगी असणारे विविध गुणकौशल्य आजच्या पिढीने आत्मसात केले पाहिजे. कोणतेही कार्य करत असताना त्याचे विविध पर्याय शोधले पाहिजेत. एक पर्याय चुकीचा ठरला तर दुसरा आणि दुसराही चुकीचा ठरला तर तिसरा पर्याय आपल्याकडे उपलब्ध असावा. फक्त शिवाजी महाराज की, म्हटल्यावर “नुसतंच जय जय म्हणून काहीही उपयोग होत नाही, होणार नाही. हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे.
(या लेखात ठळक केलेल्या ओळी गोविंद पानसरेलिखित शिवाजी कोण होता?” या पुस्तकातील आहेत.)
- मंगेश विठ्ठल कोळी.
- मो. ९०२८७१३८२०
- ईमेल mangeshvkoli@gmail.com
(Mangesh Koli) माझे असे प्रेरणादायी विचार मिळविण्यासाठी व्हॉटसअप, फेसबुक, ट्विटर, ब्लॉग, टेलिग्राम, इन्स्टाग्राम चॅनेलवर फॉलो करू शकता.

Monday, June 1, 2020

रिकामा वेळ, नवीन संधी...

महाभारतात एक सुंदर कथा येते ती अशी की, जेव्हा पांडवाना बारा वर्षाचा वनवास होतो. पांडव आणि द्रौपदी अव्दैतवनात राहू लागतात. त्यांची विचारपूस करायला भगवान श्री कृष्ण वनात जातात.
त्यांची विचारपूस करत असताना भगवान भीमाला विचारतात तुम्हाला वनवास झाला आहे आता तु काय करणार भीमा. त्यावर भीम म्हणतो आता आमच्याकडे वेळच वेळ आहे मी खाणार आणि झोपणार, हे ऐकून भगवान कपाळावर हात मारतात आणि पुढे जातात.
भगवान झोपडीत जातात तिथे बसलेल्या द्रौपदीची विचारपूस करून तिला विचारतात ताई, नकुल सहदेव कुठे आहेत? द्रौपदी म्हणते ते पहा झाडाखाली बसलेत. भगवान त्यांच्याकडे जातात आणि त्यांना पाहतात तर हे दोघे सारीपाट खेळत असतात. भगवान त्यांना पाहून म्हणतात हौस फिटली नाही वाटत तुमची, या खेळामुळे तर ही वेळ आली आहे तुमच्या सर्वांवर ते दोघे लाजतात आणि भगवंताला प्रणाम करतात.
भगवान पुढे युधिष्ठिराकडे (धर्मराजा) जातात आणि म्हणतात काय हे धर्मा तुम्ही सर्व वेळ मिळाला म्हणून फक्त आराम  करताय हे बरोबर नाही.
त्यावर अर्जुन म्हणतो, "हे कृष्णा, काय करणार आम्हाला आता वेळच वेळ आहे."
हे या सर्वांचे विचार ऐकून भगवान विचारात पडतात आणि निर्णय घेतात व सर्वांना एकत्र करून  म्हणतात चला आपल्याला इंद्राकडे जायचं आहे.
तोच अर्जुन म्हणतो, "कशाला!"
भगवान म्हणतात तुला मृदंग शिकायचा आहे, धर्माला सल्ला कसा द्यायचा हे शिकायचं आहे, भीमाला स्वयंपाक, सहदेवाला घोडे राखायला, नकुलाला रथ चालवायला आणि द्रौपदीला झाडलोट करणं शिकायचं आहे. हे ऐकताच सर्व आचर्यचकित होऊन भगवंताकडे पाहू लागले.
धर्मराजा म्हणाले - भगवान आम्ही राजे आहोत, हे शिकुन काय फायदा? तुम्ही द्रौपदीचा तरी विचार करा ती भरतवर्षाची स्मरादिनी आहे.
भगवान म्हणतात जास्त विचार करू नका, वेळ आल्यावर कळेल सर्व. आणि हे सर्व इंद्र महालात जाऊन विविध काम शिकतात.
बारा वर्षांचा वनवास संपतो. पण एक वर्षाचा अज्ञातवास राहिला होता.  (कौरवांनी बारा वर्षाचा वनवास पांडवाना दिला होताच पण त्याबरोबर असा डाव पण केला होता कि जर वनवासानंतर एक वर्षात जर तुम्ही आम्हाला दिसला तर परत तुम्हाला वनवास आणि अज्ञातवास होईल).
आता सर्वांना कळेना की आपण एक वर्ष लपायच कुठे? त्यांनी भगवंतांना विचारलं.
भगवान म्हणतात हिच ती वेळ आहे. तुम्ही रिकाम्या वेळात जी इंद्राकडे जाऊन काम शिकलात ना, आता तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि भगवंताने त्यांना विराट राजाचा पत्ता दिला.
ते सर्वजण स्वतःची ओळख लपवून विराट राजाकडे सेवकाची काम करतात. यात धर्मराजा कंक नावाचा ब्राह्मण होतो आणि राजाला सल्ला देतो, भीम बल्लव नावाचा आचारी होतो, अर्जुन बृहन्नडा नावाचा मृदंग वादक होतो, सहदेव घोडे राखणारा, नकुल रथ सारथी तर द्रौपदी विराट राजाच्या रानीची दासी होते.
या प्रमाणे खाली वेळात शिकलेल्या कामाचा त्यांना अशा प्रकारे फायदा होतो.
*तात्पर्य -*  या कथेवरून हेच कळते की रिकामा वेळ मिळाला की झोपा काढण्यात आणि Games खेळण्यात वाया घालवायचा नसतो. तर या वेळात आपल्या बुद्धीला चालना मिळेल अशी कामं करावी.
व्यायाम, योग, घरगुती कामे, कोडी सोडवणे, विद्यार्थानी पुढच्या वर्षाचा अभ्यास, मुलामुलींनी दोघांनी वेगवेगळे पदार्थ करायला शिकणे, गावात असाल तर शेतीची कामे अशी खुप काम आहेत आपल्याकडे.
सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे आपल्या बुद्धीला मनाला चालना मिळण्यासाठी धार्मिक ग्रंथांचे अवलोकन, अध्ययन करणे आवश्यक आहे. कारण आपण MBA, CA, Advocate, M.Com, ME असे उच्चशिक्षित असाल पण या शिक्षणामुळे माणूस विवेकी तर होतो.
*पण तो विवेक वापरायला अध्यात्म शिकवते*
*धार्मिक ग्रंथ वाचून कोणाला पद मिळणार नाही. पण मिळालेल्या  पदावर अहंकाररहित कसं राहायचं याची चालना मिळेल*
*कोणाला धन मिळणार नाही. पण जवळ १० रूपये जरी असतील तरी त्यात समाधानी कसं राहायचं याची चालना मिळेल*
*कोणाला प्रतिष्ठा मिळणार नाही पण दुसऱ्याच्या संपत्तीला पाहून मनात आग लागणार नाही*
भगवंताला ज्ञानी भक्त खूप आवडतो. हिच वेळ आहे मायबाप, इतके ज्ञानी व्हा कि जसे तुकोबा म्हणतात,
*तुका सहज बोले जरी वाणी,*
*वेदांत वाहे त्याच्या घरी पाणी.*
रिकाम्या वेळेचा कसा वापर कराल, तसे भविष्य घडते.