Monday, December 30, 2019

परिवार एकता दिन...


परिवार एकता दिन
आज इंग्रजी वर्षातील शेवटचा दिवस वर्षा अखेर म्हणून सर्वजण आपापल्या परीने साजरा करताना पहावयास मिळतात. या सरत्या वर्षाने आपल्याला काय दिले? आणि येणारे नवीन वर्ष काय घेऊन येणार? असा प्रश्नांची एक शृंखला अनेक व्यक्तींच्या पुढे उभा असते. चालू वर्षामध्ये घडलेल्या चांगल्या वाईट प्रसंगांच्या आठवणी, अनुभव मनी बाळगून या वर्षाला निरोप दिला जातो. 
आज या घडीला आपण कोणत्याही व्यक्तीला एक प्रश्न करून पहा तो म्हणजे, “या सरत्या वर्षाने दिलेले सुखद आणि दु:खद अनुभव सांगा.” असा प्रश्न केला तर ज्या व्यक्तीच्या मनात नकारात्मक दृष्टीकोन ठासून भरलेला असतो तो व्यक्ती या सरत्या वर्षाला नक्कीच वाईट अनुभव देणारे वर्ष म्हणून सांगतो त्याच बरोबर या वर्षभरात घडलेल्या अनेक वाईट किंवा दु:खद प्रसंगाचा पाढाच वाचायला सुरु करतो. प्रसंगी काही व्यक्ती तर बोलतात कि आता पर्यंतच्या जगण्यातील सर्वात वाईट आणि क्लेशदायक वर्ष म्हणजे हे सरते वर्ष होय.
परंतु ज्या व्यक्तींच्या मध्ये सकारात्मक दृष्टीकोन असतो त्या व्यक्ती सरत्या वर्षामध्ये घडलेल्या चांगले प्रसंग त्याच बरोबर अनेक सकारात्मक घडलेल्या गोष्टी नक्कीच सांगतात. वर्षभरात स्वत:मध्ये झालेले चांगले बदल त्याच बरोबर त्यांच्या हातून घडलेल्या चांगल्या कार्याची माहिती देतील. कदाचित याच चांगल्या कार्यामुळे सरत्या वर्षातील अनुभव उराशी बाळगून नवीन येऊ घातलेल्या वर्षामध्ये आपण नक्की काय करणार आहोत हे देखील मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने सांगतील.
या सरत्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या कुटुंबातील सदस्य सोबत किंवा संपूर्ण परिवारासोबत रहावे. तसेच किमान या वर्षभरामध्ये झालेल्या चांगल्या आठवणी, प्रसंग, घटना, त्याच बरोबर परिवारातील सर्व सदस्यांच्या मधील चांगले गुणांना उजाळा द्यावा. जेणे करून येणारे नवीन वर्ष प्रत्येक सदस्याला उत्साहाने आनंदाने तसेच सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन जगता येईल असा अनुभव या शेवटच्या दिवशी दिला पाहिजे.
परिवारातील एकता तसेच एकतेचे महत्व याच दिवशी समजून सांगितले पाहिजे. सरत्या वर्षभरात आपण परिवारातील एकता कशा प्रकारे जोपासली आणि त्याचा फायदा अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जाताना कशा प्रकारे झाला. याची देखील उजळणी करावी. जेणे करून येणारी नवीन पिढीला परीवारात्तील एकतेचे महत्व समजू शकेल. अनेक लहान मोठ्या समस्या असतील किंवा चांगले कार्य असेल त्यावेळी परिवारातील सदस्यांची होणारी मदत लक्षात ठेवली पाहिजे. परिवारातील प्रत्येक सदस्याची भूमिका आपल्या आयुष्यात किती महत्वाची आहे हे सर्वांच्या लक्षात येईल. 
आपल्या परिवारासोबत आजचा वर्षअखेर सर्वांनी सोबत घालवावा. आणि येणारे नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहाने प्रेमाने आणि कुटुंबातील व्यक्तीसोबत करावे. यामुळे परिवारातील प्रत्येकामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होईल. त्याचा फायदा जीवनात येणाऱ्या चांगल्या वाईट प्रसंगांना सामोरे जाताना नक्कीच होईल.
-    मंगेश विठ्ठल कोळी.
-    मो. ९०२८७१३८२०
-    इमेल – mangeshvkoli@gmail.com

Saturday, December 28, 2019

प्रसिद्ध ऑर्थोपेडीक तज्ञ “डॉ. सतीशकुमार पाटील” यांचा “यशाचा मार्ग” या पुस्तकासाठी शुभ संदेश....


-: शुभ संदेश :-

मा. श्री. मंगेश कोळी हे पायोस हॉस्पिटलमध्ये जनसंपर्क अधिकारी तसेच माझ्या साहित्याचे टंकलेखक व दुरुस्तीचे काम अव्याहतपणे, न थकता करीत असतात. त्यांचा मुळचा पिंड साहित्यिक आहे. आजवर त्यांची यशोमंदिर, यशोशिखर, यशोदीप, विचारवृक्ष ही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. तसेच व्यक्तिमत्व विकासासंदर्भात प्रत्येक वर्षी दिवाळी अंक प्रसिद्ध करतात. त्यांनी स्वत: M.A. (Psychology)चे शिक्षण पूर्ण केले आहे. परिसरात अनेक ठिकाणी Motivational Speech म्हणजेच प्रेरक भाषणे देत असतात. त्यांच्या भाषणांचा हजारो तरुण वर्गावर सकारात्मक परिणाम झाला आहे.
त्याचाच एक भाग म्हणून श्री. मंगेश कोळी हे “यशाचा मार्ग” हे प्रेरक पुस्तक घेऊन येत आहेत. या पुस्तकामध्ये सकारात्मक विचारसरणी, वेळेचे नियोजन, स्वत:कडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक विचारावर विजय, उत्साही विचार, आत्मविश्वास, प्रशंसा, प्रत्येक क्षणाचा विचार कसा करावा, प्रबळ इच्छाशक्ती या व अनेक विषयावर थोड्याच शब्दात पण चिंतणीय विचार प्रकट केले आहेत. हे वाचून सर्वांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निश्चित भरली जाईल. याबद्दल मला  अगदी मनापासून खात्री आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर सकारात्मकतेचे नवीन अंकुर, बीज तुमच्यात पेरले जाईल. याबद्दल मी नि:शंक आहे. श्री. मंगेश कोळी यांच्या भावी लेखन प्रपंचास मन:पासून शुभेच्छा...

डॉ. सतीशकुमार पाटील.

Wednesday, December 25, 2019

सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करणारा “यशाचा मार्ग”

सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करणारा “यशाचा मार्ग”
         माझे मित्र मंगेश विठ्ठल कोळी यांनी नेहमीप्रमाणे ह्या पुस्तकाची प्रकाशनापूर्वी एक प्रत अवलोकनार्थ दिली. तेव्हाच खरा “यशाचा मार्ग” दृष्टीपथात आला, लेखनाची प्रेरणा मिळाली. एखाद्या धन्वंतरीजवळ कोणत्याही असाध्य वाटणार्‍या व्याधीवर रामबाण मात्रा असावी त्याप्रमाणे प्रत्येक मनोव्याधी ग्रस्तावर अचूक उपाय या पुस्तकातून सापडतो. मंगेश यांचा सूक्ष्म अभ्यास, मानव जीवनात सर्वांगीण विकास व संस्कृतीचे भान ठेवून अत्यंत उपयुक्त असे हे पुस्तक प्रकाशित होत आहे. ही परिवर्तनाची दिशाच ठरावी. 
व्यक्तिपरत्वे, प्रसंगपरत्वे विविध उपायांनी यशस्वितेकडे आत्मविश्वासाने जाण्याचा मार्ग प्रकाशमान होतो. मानवरूपी खडकाळ महासागरात दीपस्तंभाचे जे कार्य असते तसे यशाचा प्रशस्त मार्ग निर्माण केला आहे. अनेक साधू-संत, थोर महात्मे यांच्या जीवनातील प्रसंग, काव्य, अभंग, प्रहसने यांचा तसेच अनेक शास्त्रज्ञ, विचारवंत यांनी सांगितलेले सिद्धांत, तत्त्व यांचा पुरेपूर उपयोग करून ह्या पुस्तकाचे एक आगळे रूप वाचकांपुढे ठेवण्यात मंगेश नक्कीच यशस्वी झाले आहेत.
विषय अनेक, ग्रंथ अनेक, ग्रंथकारही अनेक, आपले आयुष्य अल्प, वेळ थोडा, बुद्धी बेताची. काय करावे, काय शिकावे, कोणाकडे जावे? अभ्यास, योग्य सराव, परिवर्तनातील बदल अशा द्विधा अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी काय करू नये याची योग्य निदान या पुस्तकाच्या माध्यमातून मंगेश कोळी आत्मविश्वासाने करतात. धैर्य आणि संयम मिळविण्यासाठी काय करावे?
संत कबीर म्हणतात - 
कारज धीरे होत है, काहे होत अधीर |
सयम पाय तरुवर फले,केतक सीचो नीर ||
योग्य काळ आल्याशिवाय कोणतेही कार्य घडून येत नाही. योग्य काळ येईपर्यंतची आकुलता किंवा अधीरता व्यर्थ असते. वृक्षांना कितीही पाणी घातले तरी फळ यायचे तेव्हाच येणार! मनुष्य सुखासाठी आपल्या स्वभावभूत गुण विकासाकडे तितके लक्ष देत नाही जितके तो बाह्य भोगोपभोगाची साधने गोळा करण्याकडे देतो. मंगेश यांच्या सांगण्याचा अर्थ आणि हेतू यांचा सूज्ञ वाचक यांचा नक्कीच विचार करतील. 
खरे सांगू का? सुखाने हुरळून आणि दुःखाने होरपळून व्याकूळ होण्यापेक्षा विवेकशील बनून दोन्ही प्रसंगी समतोल असणे अधिक श्रेयस्कर ठरत नाही का?
मंगेश म्हणतात -
चांगले कार्य करीत रहा म्हणजे त्याचे फल आनंद, सुख, मान-सन्मान, यश:कीर्ती या स्वरुपात मिळत राहणारच. हा निसर्गाचा नियम आहे हे विसरू नका.
प्रसन्नेन सदा भाव्य विषन्नेन न कदाचन |
विषाद-परीभूतात्मा सर्वत्र परीभूयते ||
माणसाने नेहमी प्रसन्नचित्त, हसत मुख असले पाहिजे. मागे संसार आहे, संस्था आहे, जबाबदार्‍या आहेत, अडचणी आहेत हे सगळे खरे! पण त्या सर्वातून पार पडताना खेळकर आणि आनंदीवृत्तीची गल्लत होऊ देता कामा नये. मला सांगा - संतापून तरी काय फायदा? ही आदळआपट, हा आरडाओरडा, हा त्रागा, हा संताप, ही निराशा, ही उदासीनता, उव्दिगनता कशासाठी? निष्कारण स्वत:ही दु:खी व्हावयाचे व संबंधित व्यक्तीचाही आनंद घालवून बसायचे.
माझे ऐका - 
अप्रसन्नता ही वांझोटी आहे, सार्‍या विद्या-कला, सारे ज्ञान-विज्ञान, सगळा ब्रह्मानंद जन्म घेतात केवळ या प्रसन्नते पोटी. मंगेश कोळी हा यशाचा मार्ग, चिंतन मनन करून कळकळीने-तळमळीने आपल्यासाठी प्रकाशात आणत आहेत. त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळेल असा मला आत्मविश्वास आहे. हे पुस्तक प्रकाशनामागे प्रकाशक आणि त्यांचे कुटुंबिजन अत्यंत परिश्रमाने झटले, यासर्वाच्या परिश्रमाचे हे सुंदर सुगंधित फुल आज उमलत आहे. त्याचे हृदयापासून स्वागत करूया.
-      प्रा. प्रवीणकुमार वैद्य. (प्राध्यापक, लेखक, समीक्षक)
पुस्तकाचे नाव – यशाचा मार्ग
लेखकाचे नाव – श्री. मंगेश विठ्ठल कोळी.
मूल्य – २००/-
प्रकाशन – कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर
संपर्क – ९०२८७१३८२०, ०९९७५८७३५६९