Wednesday, August 28, 2019

माझा खेळ, माझा विकास.

माझा खेळ, माझा विकास.
आज क्रीडा दिनानिमित्ताने बालपणी खेळल्या जाणाऱ्या विविध खेळांचा दीर्घ परिणाम जीवनावर कशा पद्धतीने होत असत याची माहिती देण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे. खालील काही खेळांच्यामुळे आज अनेक मोठ मोठी संकटांना मी सहजपणे सामोरे जाऊ शकतो. त्यातून मार्ग काढून योग्य ते ध्येय गाठू शकतो. शारीरिक मानसिक बौद्धिक विकास होण्यास चालना मिळू शकते. आपण खालील खेळाचा अवलंब करून मुलाच्या क्षमता विकास होण्यास हातभार लावूया.
कंचे – काही वर्षापूवी हा खेळ खूप प्रसिद्ध आणि लोकप्रिय होता. जमिनीवर गोल करून किंवा अनेक गोट्या एकत्र करून ठेवल्या जायच्या त्याच्या भोवतीने एक सीमारेषा आखली जायची. त्या सीमारेषेमध्ये असणाऱ्या असंख्य गोट्यामधून एका गोटीला नेम धरून आपल्या ताकद असणाऱ्या बोटाच्या सहायाने आपल्या हातात असणाऱ्या गोटीने बाजूला केली जायची. रिंगण करून त्यात बऱ्याच गोट्या ठेवल्या जायच्या व कोणतीही गोटी उडवणार हे निश्चित करून नेम धरून तिच गोटी उडवायची. गोटी उडवल्यास ती गोटी ज्याने उडवली, त्याची व्हायची अशा प्रकारचा हा खेळ असायचा. या खेळामुळे लहान मुलांच्या बुद्धीचा विकास होत होता. लक्ष देवून लक्ष गाठण्याचा गुण यातून आपोआप शिकला जायचा आणि त्याचा उत्तम परिणाम जीवनावर होत असे.
खडे उचलणे – हा खेळ साधारणपणे मुली जास्त प्रमाणात खेळत असायच्या. या खेळात गारगोट्या, कंचे, खडे आदींचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जायचा. या सर्व वस्तू पाच, सात किंवा नऊ या स्वरुपात वापरल्या जायच्या. या वस्तू जमिनीवर टाकल्या नंतर एक एक करत वर फेकायच्या व झेलायच्या. त्यानंतर एक खडा वरती फेकल्यानंतर दोन खडे उचलायचे. कोणत्याही वस्तूचा वापर करून हा खेळ खेळला जात असल्याने परिस्थितीशी जुळवून कुशलतेचे धडे मिळायचे. या खेळामुळे हवेत फेकलेल्या वस्तू झेलायचे आणि हवेत एखादी वस्तू फेकल्यानंतर ती खाली येई पर्यंत खालच्या वस्तू गोळा करून घ्यायच्या. यामुळे वेग वेळ आणि चपळाईचा उत्तम कौशल्य अंगी बाळगण्यास मदत होत होती.
चंपूल – घराघरात खेळला जाणारा हा खेळ पाटाच्या उलट्या बाजूला खेळला जायचा. पाटाच्या उलट्या बाजूला खडूच्या सहायाने लहान लहान चौकोन आखले जायचे. (त्याला घर म्हणायचे) कवड्या किंवा चिंचोळ्याचे (चिंचेच्या बिया) दोन भाग करून त्याचादाणे म्हणून वापर केला जायचा. या खेळत कमीत कमी दोन व जास्तीत जास्त चार स्पर्धक सहभागी गहू शकत होते. मिळालेल्या अंकातून आपली गोटी फिरवून समोरच्या स्पर्धकाची गोटी बाद करायची असा धडे देणारा हा खेळ असायचा. या खेळामुळे आपल्या शरीरात डावपेच हा गुण अधिक प्रमाणात न कळत रुजला जायचा.
लगोरी – या खेळत गोल आकाराची लाकडी तुकडे अथवा फुटलेली कवले, फरशीचे तुकडे यांचा वापर केला जात असे. ज्या मुलांच्याकडे चेंडू नव्हते ती मुले कापडाचा चेंडू करत असत. चेंडूने एकमेकांवर रचलेल्या लाकडी अथवा फरशीच्या तुकड्यावर मारला जायचा. दूर गेलेला चेंडू प्रतिस्पर्धीने धरून मारेपर्यंत पडलेले तुकडे पुन्हा एकमेकांवर रचावे लागत असत. सोप्या खेळातून मुलांना कामच्या नियोजनाचे धडे मिळत होते. त्याच बरोबर एखादे काम किती लवकर पूर्ण करता येते याचे वेळेचे नियोजन करणारा विशेष गुण शिकायला मिळायचा.
चिपरी – हा खेळ बहुतांश मुलीच खेळत असत. खडूने किंवा लाकडाच्या कोळशाने जमिनीवर सात किंवा आठ चौकोण आखले जायचे. फरशीचा अथवा दगडाचा तुकडा (त्यालाच चिपरी म्हणतात) डोक्यावरून टाकून अथवा पहिल्या चौकोणात टाकून एका पायावर उभे राहून पायाच्या अंगठ्याने फरशी अथवा कवल याचा तुकडा पुढच्या चौकोणात ढकलला जायचा. हा खेळ अॅक्यूप्रेशरवर आधारित होता. यातून मुलींना सादृढता तर मिळत होतीच त्याचबरोबर जिमनॅस्टीकचे धडेही मिळत असत. या मुळे लहानपणीच शारीरिक विकास उत्तम होत असे.
कुरघोडी – एका टीममधील तीन ते चार स्पर्धक भिंतीला पकडून एकमेकांच्या सहायाने कंबरेला पकडून घोडी करत असत. दुसऱ्या टीमने घोडी झालेल्या या टीमवर धावत येवून पहिल्या क्रमांकाच्या स्पर्धकापर्यंत उडी मारून त्याह्य्चा पाठीवर बसावे लागे. टप्याटप्याने सर्व स्पर्धक उडी मारत असत. उडी यशस्वी न ठरल्यास दुसऱ्या टीमला घोडी व्हावे लागत असे. या खेळातून मुलांना वजन पेलण्याची तसेच ध्येय गाठण्याचा पाठ मिळत होता. या क्रीडा प्रकारामुळे शारीरिक सादृढता वाढीस चालना मिळत असे.
उडाण टप्पू – हा खेळ अंगणात, मैदानात, खुल्या जागेत खेळला जायचा. खाली बसून जमिनीवर पायावर पाय, त्यावर हात आणि नंतर अंगठे पकडून उभे राहिल्यानंतर त्याच्या पाठीवर उंच उडी मारावी लागत असे. असा प्रकार टप्याटप्याने पूर्ण उभे राहून केवळ मान झुकवून वरून उडी मारेपर्यंत सुरु राहायचा. जो प्रतिस्पर्धी उडी मारण्यात अयशस्वी ठरत असे त्याला जमिनीवर बसून हा सर्व प्रकार करावा लागे. उंच उडी, धावत येऊन उंची लक्षात घेऊन उडी मारावी लागत असल्यामुळे या खेळातून शारीरिक क्षमतांचा विकास होण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होत होती.
खुपसणी – हा खेळ साधारत: पावसाळ्यात चार ते पाच महिने खेळला जायचा. अणकुचीदार टोक असलेली लोखंडी सळीच्या तुकड्याचा वापर या खेळत केला हात असे. रस्त्यालगत असलेल्या चिखलात ही सळी फसवली जायची. जो पर्यंत सळी मातीत खुपसल्यानंतर पडत नाही, तो पर्यंत मुले पुढे पुढे जात असत. एकदा सळी पडली की तेथून प्रतिस्पर्धीला चिखल तुडवत, जेथून खेळ सुरु झाला त्या जागेपर्यंत पळत यावं लागत असे. या खेळामुळे योग्य अंदाज बांधणी हा गुण शिकायला मिळत असे.
विठू दांडू – हा भारतातील प्राचीन खेळ आहे. असे म्हणतात या खेळातून इंग्रजांनी क्रिकेट सुरु केले. दांडूने विटी कोलायची. कोललेली विटी प्रतिस्पर्धीने झेलायची झेलता नाही आली तर जिथे विटी पडली आहे तिथून ती दांडूला मारावी लागायची. विटी दांडूला लागल्यास खेळाडू बाद होत असे. जर विटी दांडूला लागली नाही तर दांडूने तीन वेळा विटीला हवेत उडवून दांडूने मारून टोलवली जात असे. हा खेळ पूर्णपणे मैदानावर खेळला जायचा. या खेळातून मुलांना अचूकतेचे प्रशिक्षण मिळत असे. या खेळातून मुलांची बौद्धिक क्षमताही वाढत असायची.
लपंडाव – या खेळात कितीही मुल-मुली सहभागी होऊ शकत असत. डाव असलेला सोडून इतरांनी ठरवून दिलेल्या जागेपर्यंत लपायचे. ज्या मुलावर डाव आला असेल त्याने दहा वीस तीस... असे शंभरपर्यंत म्हणत. मी आलो रे... ची आरोळी देत प्रत्येकाला शोधून काढायचे. दरम्यान लपलेल्या दुसऱ्या मुलाने त्याच्या पाठीवर थाप मारल्यास त्याला पुन्हा एकदा इतरांना शोधायचे काम करावे लागे. या खेळातून मुलाची शोध प्रवृत्तीस वाव मिळत असे.
आज हे सर्व खेळ खेळणारी मुले मुली अगदी बोटावर मोजण्याइतपत दिसतात. अनेक मुले मुली लहानपणी वेगवेगळ्या गॅजेट अडकून पडलेली दिसतात. गॅजेटचा वापर फक्त आणि फक्त कामासाठी न राहता ते आत अनेकांचे व्यसन होत असल्याचे चित्र समाजात आहेत पाहतो. यामुळे मुलांच्यामध्ये ताणताणाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. छोट्याछोट्या अपयशाने मुले स्वत:चे आयुष्य संपवत आहेत, आत्महत्या करत आहेत. याचा येणाऱ्या भावी पिढीवर वितरीत परिणाम होणार आहे. आजच्या पालकांना माझी विनंती आहे की आपणही गॅजेटचा वापर कमीत कमी करून आपल्या पाल्याबरोबर अधिकाधिक वेळ देऊन वरील प्रकारचे खेळ खेळा व त्यांच्यातील विविध शारीरिक, बौद्धिक, मानसिक, सामाजिक गुणकौशल्यांचा विकास करण्यास हातभार लावा.
-    मंगेश विठ्ठल कोळी.
-    मो. ९०२८७१३८२०
-    ईमेल mangeshvkoli@gmail.com
(Mangesh Koli) माझे असे प्रेरणादायी विचार मिळविण्यासाठी व्हॉटसअॅप, फेसबुक, ट्विटर, ब्लॉग, टेलिग्राम, इन्स्टाग्राम चॅनेलवर फॉलो करू शकता.

Sunday, August 25, 2019

आठवणीतील बहीण...

आठवणीतील बहीण.
रक्षाबंधनच्या निमित्ताने मला माझ्या बहिणीची आठवण झाली. आज सकाळपासूनच तिच्या बद्दलच्या माझ्या आठवणी मनात येत होत्या. लहान असताना काही घटना अशा घडल्या आहेत, ज्या जीवनात कदाचित कधीही न विसरण्यासारख्या आहेत. अनेक कारणांमुळे मला बहिणीची आठवण येत असते. रक्षाबंधन असो किंवा इतर कोणतेही, भाऊ बहिणीचे संबंध दृढ करणाऱ्या कोणत्याही गोष्टी असोत. मी तिला कधीही विसरू शकत नाही.
आज देखील असाच एक प्रसंग माझ्या बाबतीत घडला, त्यामुळे तिची आठवण झाली. रात्री मी ऑफिसच्या कामानिमित्त मुंबईला जाणार होतो. नेहमीप्रमाणे ऑफिसमधील कामे संपवून, रात्रीच्या महालक्ष्मी एक्स्प्रेस (कोल्हापूर ते मुंबई) रेल्वेने मी मुंबईला जाणार होतो. मी जयसिंगपूर रेल्वे स्टेशनला आलो. स्टेशनवर पोहोचल्यावर पाहिले माझ्यासारखे अनेक प्रवासी तिकडे रेल्वे येण्याची वाट पाहत उभा होते. रेल्वे येण्यासाठी आणखी थोडा अवधी होता. परंतु माझ्या मनात बहिणीच्या आठवणीचे अनेक विचार मला शांत बसू देत नव्हते. असे म्हणतात की, ‘मनात विचारांनी गर्दी नसतील तर माणूस गर्दीत सुद्धा शांत राहू शकतो आणि मनात विचार असतील तर माणूस एकटा असून देखील विचारांच्या गर्दीत अडकून पडतो.’ अशी अवस्था माझी झाली होती.
बहिणीची आज आठवण मला क्षणोक्षणी येत होती. तिच्या विचारामध्ये मी एवढा गुंतलो होतो की मी कुठे, कोणासोबत, कशासाठी उभा आहे. याचे देखील भान हरपून उभा होतो. माझ्या जवळपास कोणकोण आणि कायकाय आहे, याचे देखील भान मला नव्हते. अचानक रेल्वेच्या हॉर्नचा आवाज आला आणि मी भानावर आलो.
मी रेल्वेत चढलो, अगोदरच बुकिंग केले होते. त्यामुळे माझी जागा राखीव होती. मी जागेवर जाऊन बसलो. रेल्वे सुरु झाली. थोड्या वेळाने पुन्हा तिच्या बरोबर बालपणीच्या काही आठवणी जाग्या झाल्या. त्यात मी पूर्ण डुंबून गेलो. थोड्या वेळातच मिरज स्टेशन आले.
माझ्या सीटच्या अगदी पुढच्या सीटवर एक मुलगी, तिची आई आणि वडिल यांच्या सोबत येऊन बसली. साधारणत: २२-२३ वर्षाची असेल. रेल्वे पुन्हा सुरु झाली. माझ्या समोर बसलेली मुलगी पाहिली. तिच्या हालचाली पाहिल्या. ती रेल्वेत बसल्यापासून तिच्या आई वडिलांना अनेक प्रश्न विचार होती. तिची आई मात्र तिच्या प्रश्नांची उत्तरे देऊन देऊन कंटाळली होती. परंतु तिचे वडील मात्र कोणत्याही प्रकारचा राग व्यक्त न करता, न कंटाळता, न थकता तिच्या प्रश्नांची उत्तरे देत होते. तिच्या मनातील विचार शांत करण्याचा प्रयत्न करत होते. हा सर्व प्रसंग मी माझ्या पाहत होतो.
माझ्या समोर बसलेली मुलगी म्हणजे माझी बहीणच आहे, असे मला वाटू लागले. लहानपणी कोठेही प्रवास करण्याचा योग आला की, माझ्या वडिलांना असेच प्रश्न विचारून माझी बहीण भांबावून सोडायची. माझे वडील तिच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करत असायचे.
माझ्या समोर बसलेली ती मुलगी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या दिव्यांग होती. मी तिच्याकडे पाहिले लांब काळेभोर केस, त्यावर भरपूर तेल लावलेले, दोन वेण्या बांधलेल्या, वेणीला लाल रंगाच्या कापडी रिबन बांधलेली. उंच, रुंद आणि मोठे कपाळ, दाट आणि कोरीव भुवया, मोठे टपोरे डोळे, डोळ्यात काजळ, सुंदर नाक, गोरे गुबगुबीत गाल, नाजूक ओठ, त्याखाली चेहऱ्याला शोभेल अशी हनुवटी, अंगात फुलाफुलांचा ड्रेस, पायात चप्पल, आणि तोंडातून अनेक प्रश्नांची सतत चालू असलेली विचारणा तिच्या या वागण्यामुळे जणू माझी बहिणच माझ्या समोर आहे, असे मला वाटते. ती सुद्धा अशाच प्रकारची दिव्यांग, आभासी देवाने जन्माला घातले, परंतु आयुष्य जगणे किती कठीण असते, हे पावलो पावली जगताना समजते.
समोर बसलेल्या मुलीचे वडील तिच्या प्रश्नांची उत्तरे देत होते. ती मुलगी प्रत्येक मिनिट, दोन मिनिटाला वेगवेगळे प्रश्न विचारात होती. तिचे वडील न दमता, न थकता तिच्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तरे देऊन तिला समाधानी करण्याचा प्रयत्न करत होते.
तिच्या या हालचाली आणि हावभावाने मला माझी बहीण आठवली. ती सुद्धा अशाच प्रकारचे प्रश्न विचारून माझ्या वडिलांना विचारचक्रात अडकवत असायची. माझे वडील मात्र शांतपणे तिच्या प्रश्नाची उत्तरे देत होते.
मी कदाचित दुसरी-तिसरीला असेल. मी दररोज नेहमीप्रमाणे शाळेत गेलो होतो. दुपारची वेळ होती, जेवणाची सुट्टी झाली. सगळे मिळून शाळेत जेवलो. पुन्हा शाळेची भरण्याची बेल वाजली. आम्ही वर्गात गेलो, थोडा वेळाने आमच्या शेजारचे काका माझ्या वर्गाबाहेर दिसले. त्यांनी माझ्या गुरुजींना वर्गाबाहेर बोलावले. त्या दोघांच्यामध्ये काही तरी संभाषण झाले. गुरुजी परत वर्गात आले.
माझ्याकडे पाहत मला म्हणाले, ‘तुला घरी जायचे आहे, तुमचे शेजारचे काका तुला घ्यायला आले आहेत.’ तस मी माझे दप्तर घेतले आणि काकांच्या सोबत घरी जायला बाहेर पडलो.
घर जसजसे जवळ आले तसेतसे माणसांची गर्दी दिसू लागली. मला काही समजत नव्हते. माझ्या ओळखीचे आणि आमचे नातेवाईकही दिसले. हे सगळे अचानक का आले आहेत? असा प्रश्न मला पडला. मी थोडा पुढे गेलो, कोणी तरी मोठ मोठ्याने रडण्याचा आवाज ऐकू आला. सगळीकडे रडारड सुरु होती. मला काही कळेनाच नक्की काय झाले आहे? त्या गर्दीतून वाट काढत मी पुढे गेलो.
पुढचे चित्र पाहिले आणि मनाला मोठा धक्का बसला. माझ्या बहिणीच्या कानात असणारा सुगंधी कापसचा तुकडा, आज तिच्या नाकात घातलेला पाहिला. मी माझ्या वडिलांच्या चेहऱ्याकडे पाहिले. त्यांनी खूप काही गमावल्याचे चित्र होते. आमच्या कुटुंबातील कधीही न भरून निघणारी हानी झाली होती. या गोष्टीला आज अनेक वर्षे लोटली आहेत. परंतु माझ्या बहिण्याच्या आठवणी जशाच्या तशा आठवतात. तिच्या आठवणीने आज देखील डोळे पाणावतात. लहानपणी भावभावनांचा खेळ समजत नव्हता, परंतु आज सर्व समजत आहे. माझी बहीण माझ्या सोबत नाही. हेच माझे दुर्दैव.
-    मंगेश विठ्ठल कोळी.
-    मो. ९०२८७१३८२०
-    ईमेल mangeshvkoli@gmail.com
(Mangesh Koli) माझे असे प्रेरणादायी विचार मिळविण्यासाठी व्हॉटसअॅप, फेसबुक, ट्विटर, ब्लॉग, टेलिग्राम, इन्स्टाग्राम चॅनेलवर फॉलो करू शकता.

Friday, August 16, 2019

दिखावेगिरी कशाला?

दिखावेगिरी कशाला?
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राला नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागले. निसर्गाने पुन्हा एकदा आपल्या रौद्र रूपाचे दर्शन दिले. संपूर्ण मानव जातीच्या अहंकाराला उन्मळून ठेवण्याची ताकद फक्त आणि फक्त निसर्गामध्येच असल्याचे सिद्ध केले. कृष्णा, पंचगंगा, गोदावरी या प्रमुख नद्याबरोबर अनेक छोट्या मोठ्या नद्यांना महापूर आला होता. या महापुरामुळे अनेक गावे पाण्याने वेढली तसेच काही गावे संपूर्ण पाण्याखाली गेली होती.
विविध त्रासाने कंटाळलेला बळीराजा थोडाशा पावसाने सुखावला होता. नवीन आत्मविश्वास उरी बाळगून बळीराजाने शेतामध्ये विविध पिकांची लावण केली होती. परंतु या महापुरामुळे मानवाला शारीरिक, मानसिक, आर्थिक तसेच व्यावहारिकदृष्ट्या कधीही न भरून निघणारी हानी झाली. पशु, पक्षी व शेतातील पिके त्याचबरोबर अनेकांचे संपूर्ण संस्कार उद्वस्त होऊन गेले.
या भयावह पूर परिस्थितीपासून वाचण्यासाठी अनेक मदतीचे हात पुढे आले. या मदतीच्या हाताबरोबर त्याच्या पाठीमागे वेगवेगळ्या प्रकारचे छुपे राजकारण, राजकीय, सामाजिक आणि अहंकारी फायदा घेणाऱ्या अनेक मंडळीची डोकीवर निघाली. आपण पूरग्रस्तांना जी मदत करतो, म्हणजे या आपत्तीमध्ये अडकलेल्या व्यक्तींवर एका प्रकारचे उपकारच करतो आहे असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर व्यक्त होताना दिसतो. स्वत:च्या प्रसिद्धीसाठी अनेकांनी या आपत्तीचा फायदा देखील घेतला आहे आणखी घेत आहेत. ज्यांनी ज्यांनी पूरग्रस्तांना मदत करताना फोटो काढले, सेल्फी काढली व ती प्रिंट मिडिया तसेच फेसबुक, व्हाट्सअप्प, इंस्टाग्राम व इतर ऑनलाईन प्रसिद्धीच्या माध्यमातून अपलोड केली. त्यांच्यासाठी माझ्या वाचनात आलेली एक गोष्ट आज आपणापर्यंत पाठवत आहे.
एकदा श्रीकृष्णाने त्याच्या समोरच्या दोन टेकड्याचे रूपांतर सोन्याच्या टेकडयांमध्ये केले आणि अर्जुनाला म्हणाला..
हे सगळे सोने गावकऱ्यांना वाटून टाक,
पण अट एकच, एकूण एक सोने तू दान केले पाहिजेस.
लगेच अर्जून जवळच्या गावात गेला आणि तिथे त्याने जाहीर केले की, मी प्रत्येक गावकऱ्यांला सोने दान करणार आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने टेकडीपाशी यावे.
लोक अर्जूनाच्या मागे टेकडीच्या दिशेने चालू लागले.
पुढे अर्जुन छाती काढून चालत होता.
मागे गावकरी त्याचा जयजयकार करत होते. 
दिवस रात्र काम चालू होते.
अर्जून खोदत होता आणि सोने काढून लोकांना देत होता.
पण टेकडी थोडीदेखील संपली नव्हती.
लोक सोने घेऊन घरी जायचे आणि परत येऊन रांगेत उभे राहायचे.
आता अर्जून अगदी दमून गेला होता.
पण त्याचा अहंकार त्याला माघार घेऊ देत नव्हता. 
शेवटी त्याने कृष्णाला सांगितले की बास....!
आता यापुढे मी काम करू शकत नाही. 
मग कृष्णाने कर्णाला बोलावले आणि सांगितले की,
या दोन सोन्याच्या टेकड्या आहेत त्या तू लोकांना दान करून टाकायच्या...
पण अट एकच, एकूण एक सोने तू दान केले पाहिजेस.
लगेच कर्णाने पंचक्रोशीतील गावकऱ्याना बोलवले आणि सांगितले,
या दोन सोन्याच्या टेकड्या तुमच्या आहेत. 
एवढे सांगून कर्ण तिथून निघून गेला.
लोक सोने वाहून नेऊ लागले. अर्जून चकित होऊन पाहात बसला.
हा विचार आपल्या मनात का आला नाही? तो भयंकर अस्वस्थ झाला. 
कृष्ण मिश्कीलपणे हसला आणि म्हणाला...
अनावधानाने का होईना तू सोन्याकडे आकर्षित झालास..!
तू गर्वाने प्रत्येक गावकऱ्याला सोने वाटू लागलास.
जणू काही आपण उपकार करतो आहोत अशा थाटात तू दान करत होतास..!  
कर्णाच्या मनात असले काहीही नव्हते.
त्याने दान केले आणि तो निघूनही गेला.
आपले कुणी कौतुक करतंय, गुणगान गातंय हे पाहण्यासाठी देखील तो थांबला नाही.
व्यक्ती प्रकाशाच्या मार्गावर चालत असल्याचे हे लक्षण आहे.
थोडक्यात म्हणजे देणगीच्या बदल्यात, मदत केलेल्याच्या बदल्यात लोकांनी आपले कौतुक करावे, शुभेच्छा द्याव्यात, शाबासकी द्यावी, धन्यवाद द्यावेत, अशी अपेक्षा ठेवणे हे कधीच निरपेक्ष दान नसते. अशावेळी तुम्ही जिंकून देखील हरलेले असता.
मग एखाद्याला मदत करत असताना स्वत:ची प्रसिद्धीचे लागलेले व्यसन केव्हा सुटणार आहे कोणास ठाऊक?
हा संदेश सद्य स्थितीस योग्य वाटला म्हणून यावर थोडस लिहाव अस वाटलं. या महापुरात स्वत:चा जीव धोक्यात घालून इतरांचे जीव वाचवणाऱ्या एका ही भारतीय जवानांनी स्वत:चा सेल्फी काढलेला मी पाहिला नाही. कारण ते निरपेक्ष भावनेने कार्य करत आहे. अशा असंख्य लोकांना ज्यांनी कार्य मानवता, कर्तव्य, सामाजिक बांधिलकी अशा भावनेने केले त्यांचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहे.
-      मंगेश विठ्ठल कोळी.
-      मो. ९०२८७१३८२०
-      ईमेल – mangeshvkoli@gmail.com
-      (Mangesh Koli) माझे असे प्रेरणादायी विचार मिळविण्यासाठी व्हॉटसअॅप, फेसबुक, ट्विटर, ब्लॉग, टेलिग्राम, इन्स्टाग्राम चॅनेलवर फॉलो करू शकता.